रंगनाथ कोकणे
जल, वायू आणि ध्वनिप्रदूषणाविषयी आपण ऐकलेले असते; परंतु “कपड्यांचे प्रदूषण’ हा शब्द आपण कधीच ऐकलेला नाही. होय, स्मार्ट आणि फॅशनेबल दिसण्यासाठी आपण जे वेगवेगळ्या प्रकारचे बेसुमार पोशाख खरेदी करतो आणि वापर करून झाल्यानंतर फेकून देतो, त्यातून जगभरात हे प्रदूषण वेगाने पसरत असून, “क्लॉथ पोल्यूशन’ ही नवीच चिंता जगासमोर उभी राहिली आहे.
पर्यावरणासाठी घातक बनत चाललेली परिस्थिती केवळ आपल्या सार्वजनिक घडामोडींमुळे तयार होत आहे, असे नव्हे तर व्यक्तिगत जीवनशैलीही त्यास कारणीभूत ठरत आहे. गरजांची वाढती यादी तर नैसर्गिक स्रोतांच्या अतिरेकी दोहनाला कारणीभूत आहेच; परंतु आपल्या आवडीनिवडीही या पृथ्वीवर कचऱ्याचे ढिगारे उभे करीत आहेत. लाइफस्टाइलच्या नावाखाली निर्माण होत चाललेली नवेपणाची आवड निसर्गाचे रंग हिरावून घेण्याचे मुख्य कारण ठरत आहे. नव्या स्टाइलचे आणि फॅशनचे कपडे परिधान करण्याचा शौक पृथ्वीच्या अंगणाचे रंग फिके करत चालला आहे.
पर्यावरणाच्या प्रदूषणाची चिंता करताना सामान्यतः धूळ आणि धुराचे लोट, प्लॅस्टिक आणि कीटकनाशकांचा वाढता वापर एवढेच नव्हे तर नवीन तंत्रज्ञानाचाही उल्लेख केला जातो. परंतु कपड्यांमुळे पसरत असलेल्या प्रदूषणाची चर्चाच कधी होत नाही. वास्तविक, गेल्या काही वर्षांत फॅशन आणि हरघडी बदलत्या स्टाइलमुळे होत असलेली कपड्यांची अनावश्यक खरेदीही आपल्या धरित्रीच्या छातीवर प्रदूषणाचे डोंगर उभे करीत आहे. दक्षिण अमेरिकेतील चिली येथील अटाकामा वाळवंटात उभे राहिलेले जुन्या कपड्यांचे डोंगर प्रदूषणाच्या बाबतीत वेगळीच चिंता निर्माण करणारे ठरले आहेत. विकले न जाणारे आणि वापरून फेकून दिलेले कपडे या वाळवंटात टाकून दिले जातात.
या कपड्यांचे डोंगर इथे वाढत आहेत. कल्पनाही करता येणार नाहीत इतके उंच म्हणजे सुमारे वीस हजार फूटांपेक्षा अधिक उंचीचे 22 डोंगर या ठिकाणी उभे राहिले आहेत. दरवर्षी या वाळवंटात तब्बल 39 हजार टन इतक्या वजनाचे फेकून दिलेले कपडे आणले जातात आणि येथील डोंगरांची संख्या तसेच उंची आणखी वाढते. या ढिगाऱ्यांमुुळे पसरत असलेल्या प्रदूषणाचा धोका प्लॅस्टिक प्रदूषणासारखाच वाढत आहे. अनेक प्रकारची रसायने आणि रंग या कपड्यांच्या निर्मितीसाठी वापरलेले असतात. हे कपडे बायो-डिग्रेडेबल नाहीत. त्यामुळे हे कपड्यांचे ढीग नष्ट होण्यासाठी 200 वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागू शकतो. तोपर्यंत नवे किती डोंगर उभे राहतील, याची कल्पनाच न केलेली बरी! एका अंदाजानुसार जगभरात दरवर्षी 9 कोटी टन वजनाचे वापरलेले कपडे फेकून दिले जातात. स्टायलिश बनण्याची ओढ पर्यावरणासाठी किती घातक बनली आहे, हे यावरून लक्षात येते.
जगाच्या पाठीवर प्रत्येक भागात असा एक वर्ग आहे, जो संसाधनांचा वापर प्रमाणापेक्षा अधिक करतो. अलीकडील काळात नवीन कपडे खरेदी करण्याच्या प्रक्रियेत आलेला सुटसुटीतपणा, गरजेपेक्षा इच्छा-आकांक्षा महत्त्वाच्या ठरणे आणि देखावा संस्कृतीतून जन्माला आलेले स्टाइल स्टेटमेंट यामुळे कपड्यांची रद्दी वाढत चालली आहे. फास्ट फॅशन क्लोदिंग म्हणजेच आपल्याकडे असलेले कपडे वापरण्यायोग्य असूनसुद्धा नवीन कपडे विकत घेण्याची सवय आता केवळ विकसित देशांमधील समाजातच नव्हे तर विकसनशील आणि मागास देशांमधील लोकांमध्येही चांगलीच रुजली आहे. यामुळे वाढलेल्या मागणीने केवळ कपड्यांचे उत्पादनच वाढले असे नाही, तर वापर झालेले कपडे फेकून देण्याच्या वृत्तीतदेखील वाढ झाली.
संयुक्त राष्ट्रांच्या दोन वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात असे म्हटले आहे की, जागतिक स्तरावर 2000 ते 2014 या कालावधीत कपड्यांचे उत्पादन दुप्पट झाले. उत्पादनातील ही वाढ थेट पाण्याच्या अतिरेकी वापराशीही संबंधित आहे. जीन्सचा एक जोड तयार करण्यासाठी साडेसात हजार लीटर पाणी लागते, हे लक्षात घेतले पाहिजे. एवढेच नव्हे तर कोणत्याही प्रकारचे कपडे तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कापसाच्या एक किलो उत्पादनासाठी 20 हजार लीटर पाणी लागते. सध्याच्या परिस्थितीत काही विकसित देशसुद्धा पाणीसंकटाचा सामना करीत आहेत. वायू प्रदूषणाचे उग्र स्वरूप हा संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय बनला आहे.
अशा स्थितीत जगभरात कपड्यांचे वाढत असलेले उत्पादन जगातील 20 टक्के पाणी संपवून टाकते आहे, ही गोष्ट अत्यंत चिंताजनक म्हणावी लागेल. त्याचप्रमाणे फेकून दिलेल्या कपड्यांचे ढिगारे खुल्या हवेत असल्यामुळे त्यातील रसायने हवा प्रदूषित करीत आहेत. जमिनीत दबल्या गेलेल्या जुन्या कपड्यांमुळे भूगर्भातील पाणी दूषित होत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मते, कपडे आणि पादत्राणांच्या निर्मितीची प्रक्रिया जागतिक स्तरावर हरितगृह वायू उत्सर्जनास 8 टक्के कारणीभूत ठरते.
आजकालच्या दिखाऊपणाच्या संस्कृतीत लाइफस्टाइल म्हणून स्वीकारण्यात येत असलेली संस्कृती जलवायू परिवर्तनाशी निगडीत आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. पाण्याच्या टंचाईचा विषय असो किंवा बेसुमार जंगलतोडीचा असो, गरजांपेक्षा इच्छा-आकांक्षा महत्त्वाच्या ठरत असल्यामुळेच हे सर्व घडत आहे. तापणारी पृथ्वी, वाढते जलसंकट, नष्ट होत चाललेली जंगले आणि हवेत विरघळत असलेले विषारी वायू याबद्दल तक्रार सर्वचजण करतात;
परंतु पर्यावरणाच्या बिघडत्या परिस्थितीत आपली जबाबदारी समजून घेण्याची इच्छा आणि तेवढा वेळ कुणाजवळच नाही. पर्यावरणाची जोपासना करायची असेल तर जागरूकता आणि जबाबदारीची भावना ही आपल्या दैनंदिन जीवनातील सवय बनली पाहिजे. साध्या जीवनशैलीचा अवलंब केल्यामुळेच आपल्याला नैसर्गिक संसाधनांची जपणूक करता येईल. या प्रक्रियेचा आपल्या विचारांशी आणि सजगतेशी घनिष्ट संबंध आहे.