मुंबई – शेअर बाजार सध्या विक्रमी पातळीवर असूनही काही गुंतवणूकदार निवडक खरेदी करीत आहेत. त्यामुळे शुक्रवारी शेअर बाजाराचे निर्देशांक नव्या विक्रमी पातळीवर गेले.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी शुक्रवारी 69 अंकांनी म्हणजे 0.44 टक्क्यांनी वाढून 15,860 या नव्या विक्रमी पातळीवर बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 226 अंकांनी वाढून 52,925 अंकांवर बंद झाला.
सरलेल्या आठवड्यात बरीच खरेदी होऊन सेन्सेक्स 580 अंकानी तर निफ्टी 177 अंकांनी वाढला. भारतात बऱ्याच राज्यात निर्बंध कमी करण्यात आले आहेत. त्याचबरोबर करोना रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे आगामी काळात अर्थव्यवस्था विस्तारेल आणि कंपन्यांचे नफे वाढत जातील असे गुंतवणूकदारांना वाटत आहे.
मोठ्या कंपन्यापेक्षा छोट्या कंपन्यांच्या शेअरची शुक्रवारी जास्त खरेदी झाली. त्यामुळे मिड कॅप आणि स्मॉल कॅप एक टक्क्यापर्यंत वाढल्याचे दिसून आले. ऍक्सिस बॅंक, इन्फोसीस, आयसीआयसीआय बॅंक, स्टेट बॅंक, बजाज फिन्सर्व, मारुती, एल अँड टी या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. तर रिलायन्स इंडस्ट्रीज, एनटीपीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर, टायटन, एशियन पेंट्स या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला.
जागतिक बाजारात तेजीचे वातावरण असल्यामुळे भारतीय शेअर बाजारात खरेदी झाली. अमेरिकेतील बेकारीचा दर कमी होत आहे. अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांवर खर्च केला जाणार आहे. त्यामुळे वॉल स्ट्रीटसह इतर देशाच्या कंपन्यांचे शेअर वाढले. त्यामुळे भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक विक्रमी पातळीवर असूनही खरेदी चालूच राहिली.
आजच्या तेजीचे नेतृत्व बॅंका आणि धातू क्षेत्रातील कंपन्यांनी केले. गुंतवणूकदारांचे रुपयाच्या मूल्याकडे बारीक लक्ष आहे. आज रुपयाचे मूल्य दोन पैशांनी कमी झाले. रुपयाचे मूल्य जर जास्त प्रमाणात घसरले तर परकीय संस्थागत गुंतवणूकदार विक्री करण्याची शक्यता आहे.