मुंबई – शेअर निर्देशांक कमालीच्या उच्च पातळीवर असतानाच जागतिक बाजारातून नकारात्मक संदेश आल्यामुळे धीर सोडलेल्या गुंतवणूकदारांनी गुरुवारी तुफान विक्री केली. त्यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक कोसळले. परिणामी एकाच दिवसात गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचे मूल्य 4.5 लाख कोटी रुपयांनी कमी झाले.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स तब्बल 1,158 अंकांनी कोसळून 59,984 अंकांवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 353 अंकांनी म्हणजे 1.94 टक्क्यांनी कोसळून 17,857 अंकांवर बंद झाला. 6 महिन्यात निर्देशांकात प्रथमच एका दिवसात एवढी मोठी घट नोंदली गेली आहे.
रिलायन्स सिक्युरिटीजचे विश्लेषक विनोद मोदी यांनी सांगितले की, वित्तीय संस्था आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची जोरदार विक्री झाल्यामुळे निर्देशांकांवर परिणाम झाला. इतर क्षेत्राचे निर्देशांकही आज झालेल्या जोरदार विक्रीमुळे कमी झाले.
आयटीसी कंपनीचा शहराचा पाच टक्क्यांनी कोसळला. आयसीआयसीआय बॅंक, कोटक बॅंक, ऍक्सिस बॅंक, स्टेट बॅंक, एचडीएफसी बॅंक या कंपन्यांच्या शेअरचीही आज तुफान विक्री झाली. इंडसइंड बॅंक, एल अँड टी, अल्ट्राटेक सिमेंट, एशियन पेंट्स या कंपन्यांच्या शेअरच्या भावात किरकोळ वाढ नोंदली गेली. जागतिक बाजारातून नकारात्मक संदेश येण्याबरोबरच फ्युचर अँड ऑप्शनची मासिक मुदत आज संपत होती. त्यामुळेही निर्देशांकावर परिणाम झाल्याचे ब्रोकर्सनी सांगितले.
काही कंपन्यांच्या ताळेबंदातील नफा कमी होत आहे. त्याचबरोबर डॉलर वधारत असल्यामुळे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार विक्री करीत आहेत. या महिन्यात आतापर्यंत या गुंतवणूकदारांनी 9,295 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली आहे. संस्थागत गुंतवणूकदार विक्री करीत असल्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारही विक्री करण्याच्या मनस्थितीत असल्याचे चित्र आज बाजारात दिसले.