मुंबई – शेअर बाजारात गुंतवणूकदारांकडून जोरदार खरेदी होऊ लागली आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांमध्ये शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे बाजार मूल्य तब्बल 10.19 लाख कोटी रुपयांनी वाढले असल्याचे दिसून येते.
गेल्या तीन दिवसांमध्ये मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स चार टक्क्यांनी म्हणजे 2,176 अंकांनी वाढला आहे. त्यामुळे शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे बाजारमूल्य 258 लाख कोटी रुपयांवर गेले आहे. यासंदर्भात मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस या कंपनीचे रिटेल संशोधन प्रमुख सिद्धार्थ खेमका यांनी सांगितले की, मान्सून योग्य पद्धतीने वाटचाल करीत आहे.
त्याचबरोबर अमेरीका आक्रमक व्याजदर करण्याची शक्यता कमी झाल्यामुळे भारताबरोबरच जागतिक पातळीवर गेल्या तीन दिवसात शेअर बाजाराचे निर्देशांक मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदाराकडील गुंतवणुकीचे मूल्य तीन दिवसात वाढले.
चीनमध्ये करोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यास यश मिळत असल्याचे दिसून येत असल्यामुळे जागतिक शेअर बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असल्याचे त्यांनी सांगितले.