पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- राज्यात नियमित लसीकरणांतर्गत वर्षभरात १९ लाख चार हजार बालकांचे लसीकरण करण्याच्या उद्दिष्टांपैकी १७ लाख नऊ हजार बालकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. म्हणजेच राज्यात सरासरी ९० टक्के लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
दि. १६ मार्च १९९५ ला शासनाने पाेलिओ निर्मूलनासाठी पाेलिओचा पहिला डाेस दिला. तेव्हपासून लसीकरणाबाबत जागृती करण्यासाठी दरवर्षी १६ मार्च हा राष्ट्रीय लसीकरण दिन म्हणून पाळण्यात येताे. बालमृत्यू आणि बालकांमधील आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी बालकांचे योग्य वयात संपूर्ण लसीकरण करणे ही अत्यंत सोपी, कमी खर्चाची पण अत्यंत प्रभावी उपाययोजना आहे.
बालकांमधील क्षयरोग, घटसर्प, धनुर्वात, डांग्या खोकला, हिमोफिलस इन्फ्लूएन्झा टाइप बी, रोटा व्हायरस, डायरिया, जापनीज मेंदूदाह, पोलिओ, कावीळ, गोवर व रुबेला या आजारांमुळे होणारे मृत्यू कमी करणे हे नियमित लसीकरण कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
या कार्यक्रमांतर्गत बीसीजी लस क्षयरोगासाठी दिली जाते. तर, डीपीटी लस ही घटसर्प, धनुर्वात, डांग्या खोकला, पोलिओ, गोवर-रुबेला, कावीळसाठी या सगळ्या आजारांवर लस उपलब्ध आहे.
रोटा व्हायरस लस अतिसारावर, जापनीज एन्सेफेलायटिस लस ही जापनीज एन्सेफेलायटिस आजाराच्या प्रतिबंधासाठी, न्यूमोकोकल लस न्यूमोकोकल आजारांपासून प्रतिबंधात्मक साधन म्हणून दिल्या जातात. सर्व आरोग्य संस्थांमध्ये तसेच बाह्यसंपर्क कार्यक्षेत्रात लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात येते आणि लाभार्थींना लसी दिल्या जातात. लसीची क्षमता टिकून राहण्यासाठी लसीची वाहतूक शीतसाखळी अबाधित ठेवून करण्यात येते. – डॉ. प्रवीण वेदपाठक, राज्य लसीकरण विभागप्रमुख
महाराष्ट्रात नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत झालेल्या लसीचे उद्दिष्ट पूर्ण
– पूर्ण लसीकरण केलेली मुले : १७ लाख ९ हजार, ९० टक्के पूर्ण
– एमआर : २ : १६ लाख ३१ हजार, ८७ टक्के पूर्ण
– डीपीटी पहिला बूस्टर डाेस : १६ लाख ५७ हजार, ८८ टक्के पूर्ण
– ओपीव्ही बूस्टर : १६ लाख ५५ हजार, ८८ टक्के पूर्ण