पुणे- “एसटी’तील कामगारांनी फार टोकाची भूमिका न घेता विद्यार्थी आणि प्रवाशांकरिता सामंजस्याची भूमिका घ्यायला हवी, त्यांनी संप संपवून पूर्वपदावर काम करावे, अशी आमची इच्छा आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कामगारांना आवाहन केले.
एसटीच्या संपाबाबत अजित पवार यांना विचारले असता त्यांनी एसटी कामगारांना विनंती करीत पूर्वपदी कामावर येण्याची इच्छा व्यक्त केली. याबाबत अनिल परब यांनी शेवटचे आवाहन केले आहे. तसेच मीही एसटी कर्मचाऱ्यांना सर्वांना आग्राहची विनंती करतो, आता जो काही निर्णय घेतला आहे,
त्यामध्ये आणखी काही नवीन घडेल, असे वाटत नाही. त्यांना पगार कमी होते, आता बऱ्यापैकी पगार वाढवले आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि प्रवाशांकरिता संप संपवून पूर्वपदावर एसटीने काम करावे, अशी आमची इच्छा असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.
याशिवाय बारा आमदार निलंबन हे विधिमंडळाने घेतलेला निर्णय होता. विधानसभेच्या कामाबाबत सर्व कायदे लिखीत आहेत. काल जो निकाल लागला त्याबाबत विधीमंडळ कायदे तज्ज्ञाशी चर्चा करून निर्णय घेतील. न्यायव्यवस्था जो निकाल देते त्याबाबत आम्ही काही बोलण उचित ठरत नाही. माझ्या कामाची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे कोणी काय म्हटल मला माहिती नसल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.