मुंबई – भारतातील काही धार्मिक आणि अध्यात्मिक पर्यटन स्थळावरील पर्यटकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे या ठिकाणी रिटेल ब्रँडची उपस्थितीही वाढत असल्याचे निरीक्षण एका अभ्यास अहवालात नोंदविण्यात आलेले आहे. यासंदर्भात सीबीआरई या संस्थेने तयार केलेल्या अहवालानुसार देशातील 14 पर्यटन स्थळावर रिटेल ब्रँडची उपस्थिती लक्षणीयरीत्या वाढली असल्याचे आढळून आले. (Spiritual tourism increased)
ज्या पर्यटन स्थळाचा यासाठी अभ्यास करण्यात आला आहे त्यामध्ये अमृतसर, अजमेर, वाराणसी, कातरा, सोमनाथ, शिर्डी, अयोध्या, पुरी, तिरुपती, मथुरा, द्वारका, बोधगया, गुरुवयूर, मदुराई अश्या चौदा शहरांचा समावेश आहे. या अहवालातील माहितीनुसार भारतातील मध्यमवर्ग आणि उच्चवर्ग इतर पर्यटनाबरोबरच धार्मिक किंवा अध्यात्मिक पर्यटनाला जास्त महत्त्व देतो.
भारतामध्ये मोजक्या शहरांमध्ये बर्याच प्रमाणात देश विदेशातील पर्यटक येतात. हा पर्यटक सधन वर्गातला असू शकतो. त्यामुळे त्यांच्या रिटेल ब्रँडच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बरेच रिटेलर्स धावून आले आहेत. या अहवालातील माहितीत म्हटले आहे की, या पर्यटन स्थळाभोवती बरेच मॉल आता उघडले जात आहेत. त्याचबरोबर संबंधित शहरातील मोठ्या रस्त्याच्या बाजूलाही दुकाने थाटली जात आहेत. यामध्ये रिलायन्स ट्रेंड्स, मान्यवर, रेमंड, मार्केट 99, पेंटालून, डोमिनोज, पिझ्झा हट, रिलायन्स मार्ट, झुडिओ, शॉपर स्टॉप, बर्गर किंग, मॅकडोनाल्ड, स्पेन्सर्स, क्रोमा इत्यादी ब्रँडचा समावेश आहे.
सीबीआरईचे भारतासाठीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंशुमन मॅगझीन यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले की, भारतामध्ये अध्यात्मिक पर्यटन वाढत आहे आणि याचा फायदा संबंधित कंपन्या घेणे अपेक्षित आहे. त्यामुळे पर्यटन स्थळावरील रिटेल दुकानासाठी बाजारपेठही विकसित केली जात आहे. त्यामुळे तिथे विकसकांना चांगल्या संधी निर्माण झाल्या आहेत.
सरकारकडून प्रयत्न
भारत सरकारने एकूणच पर्यटन वाढावे यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळेही या पर्यटन स्थळाचा चेहरा मोहरा बदलत आहे. पर्यटनामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतो. त्याचबरोबर या ठिकाणी जास्त पायाभूत सुविधा विकसित करण्याची गरज नाही. त्यामुळे सरकारने पर्यटनावर भर दिला असल्याचे समजले जाते.