– कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त)
आज 4 डिसेंबर म्हणजे नौदल दिन. ‘ऑपरेशन जॅकपॉट’ ही 1971 मध्ये तत्कालीन ईस्ट बंगालमध्ये भारतीय नौसेना व मुक्ती वाहिनीच्या सदस्यांनी केलेल्या हल्ल्याची कहाणी आहे.
भारत आणि पूर्व पाकिस्तानच्या सीमेजवळ जेथे प्लासीचं युद्ध झालं तेथे भागीरथी नदीच्या काठी मुक्ती वाहिनीच्या नौदल जवानांना प्रशिक्षण देण्यासाठी कॅम्प उभारण्यात आला. याचे कोडनेम ‘कँप टू प्लासी : सी2पी’ असे होते. या कँपमधील दिवस बांगलादेश ‘आमार शोनार बांगला’ या राष्ट्रगीतानंतर त्यांच्या झेंड्याला सलामी देऊन सुरू होत असे. ऑपरेशनची खरी आखणी जुलै, 1971मध्ये करण्यात आली. आमच्या वरिष्ठांनी जवळपास दीडशे बंगाली समुद्री कमांडोंना पूर्व पाकिस्तानच्या दक्षिण भागात पाठवण्याचा निर्णय घेतला. या ऑपरेशनचे कमांडर सामंत यांनी ईस्ट पाकिस्तानमधील चारही बंदरांवर उभ्या असलेल्या पाकिस्तानी युद्धनौकांवर एकाच वेळी हल्ला करायचा निर्णय घेतला.
समुद्र व नद्यांची भरती ओहोटी, हवामान आणि पाकिस्तानी नेव्हल व आर्मी डिप्लॉयमेंटबद्दलची माहिती मुक्ती वाहिनीच्या योद्ध्यांनी मिळवून दिली. आकाशवाणीच्या कलकत्ता बी केंद्रावरून सकाळी सहा वाजता आरती मुखर्जी यांनी गायलेले गाणे वाजले की, 48 तासांच्या आत हल्ला करायचा हे मुक्ती वाहिनी समुद्री कमांडोंच्या मनावर बिंबवण्यात आले होते. त्यानंतर हेमंत कुमार यांचे गाणे वाजवण्यात आले की त्याच रात्री, चितागोंगसहित चारही बंदरातील युद्ध नौका आणि जहाजांवर लिंपेट माइन्स लावून हल्ला करायचा असे ठरले. ठरल्यानुसार मुक्ती वाहिनीचे हे समुद्री कमांडो विविध मार्गांनी, वेषांतर करून चारही शहरांत दाखल झाले. त्यांनी कोलकाता आकाशवाणी केंद्रावर आरती मुखर्जींनी गायलेले ‘अमार पुतुल आजके प्रोथम जाबे शोशुर बारी’ हे गाणे 13 ऑगस्टला आणि दुसरं हेमंत कुमारनी गायलेले ‘आमी तोमार जोतो शुनिये चिलेम गान’ हे गाणे 14 ऑगस्टला ऐकले. त्याचा अर्थ हा, त्याच रात्री हल्ला करण्याचा फायनल कॉल होता.
त्याकाळी पूर्व पाकिस्तानमधे शेकडो बस आणि तीन चाकी ऑटो चालत असत. पण कुणाच्या लक्षात न येता आरामात फिरता येऊ शकेल अशा कार जवळपास नव्हत्याच. यासाठी या कमांडोंनी, ‘वॉटर अँड पॉवर डेव्हलपमेंट ऑथोरिटी’चे टोयोटा पिकअप ट्रक्स मिळवले. त्यात लिंपेट माइन्स ठेवून त्या शेवग्याच्या शेंगा व पानांखाली दडवल्या. हे सर्व ट्रक्स आपल्या लक्ष्यांच्या जवळच्या गावी नेण्यात आले. तेथील सुरक्षित घरात या लिंपेट माइन्समध्ये डिटोनेटर्स बसवून त्यांच्या विरघळणार्या प्लग्जवर निरोध लावण्यात आलेत. संपूर्ण पूर्व पाकिस्तानमध्ये 14 ऑगस्ट 1971च्या मध्यरात्री 160 प्रशिक्षित बंगाली हल्लेखोर आणि त्यांचे प्रशिक्षक भारतीय नौसैनिक यांनी आपापल्या लुंग्या बनियान काढून स्विमिंग ट्रंक्स आणि पायात रबराचे फिन्स घातले. प्रत्येकाने विविध रंगी गमछ्यात घट्ट बांधलेल्या लिपेंट माइन आपल्या छातीला बांधल्या आणि जहाजे नष्ट केली, तसेच बंदरांवर हल्ला करून 12 बोटी उडवून दिल्या.
त्या दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास, चितागोंगमध्ये मुक्ती वाहिनीचे शाह आलम पाण्यात उडी घेत सावकाश पोहत एक किलोमीटर लांब उभ्या असलेल्या पाकिस्तानी युद्धनौकेकडे गेला. त्याच्या मागोमाग, सहा जणांनी नदीत उडी घेतली. फ्रान्समधल्या पीएनएस मांगरोवरून दांडी मारून आलेला लिडींग सी मन अब्दुल वाहेद चौधरी हा या ऑपरेशनचा कंट्रोलर होता. नदीच्या प्रवाहासोबत, दूर उभ्या असलेल्या युद्धनौकांकडे पोहत जाऊन, त्या युद्धनौकांच्या तळाला लागलेले शेवाळ चाकूने साफ केल्यावर, त्याला लिंपेट माइन चिकटवून पुन्हा पोहत दुसर्या किनार्यावर पोहत जाण्याचे प्रशिक्षण या सर्व कमांडोंना देण्यात आले होते. मध्यरात्रीची वेळ यासाठी निवडली होती. कारण यावेळी नदीत भरती असते आणि जहाजावरची शिफ्ट बदलते. मोठ्या लाटा असल्याने शाह आलम व त्याचे सहकारी दहा मिनिटांत वांछित युद्धनौकांजवळ पोहोचले. त्यांनी छातीला बांधलेल लिंपेट माइन काढले, गुंडाळलेले कापड आणि निरोध दोन्ही प्रवाहात दूर फेकले. माइनचे चुंबक युद्धनौकेला चिकटताच ते पुन्हा पोहत किनार्याकडे गेलेत. तेथे पोचताच त्यांनी आपापले फिन्स, चाकू आणि स्विमिंग ट्रंक्स काढून, चिखलात लपवले, कमरेला लगेच लुंगी गुंडाळून ते आपल्या गावांकडे चालते झाले.
बरोबर अर्ध्या तासाने मध्यरात्री एक वाजून चाळीस मिनिटांनी चितागोंग बंदरात पाण्याखाली स्फोट सुरू झाले. पाकिस्तानी युद्धनौका अल अब्बासखाली पहिला स्फोट झाला आणि काही मिनिटांतच ती बुडू लागली. बंदरावर एकच धावपळ सुरू झाली. तिथे तैनात पाकिस्तानी सैनिकांनी पाण्यात फायरिंग सुरू केली. एकामागून स्फोट होत गेले. लिंपेट माइनमुळे झालेल्या भगदाडांतून या युद्धनौका व जहाजांमध्ये पाणी शिरू लागले आणि बघता बघता त्यांना जलसमाधी मिळाली. थोड्याफार फरकानी हीच कारवाई उर्वरित तीनही ठिकाणी झाली होती. त्याच रात्री नारायणगंज, चांदपूर, चालना आणि मौंगलामध्येही अनेक मोठे स्फोट झाले. या संपूर्ण मोहिमेत पाकिस्तानच्या नौदलाच्या एकूण 65,500 टन वजनी जहाजे, युद्धनौकांना जलसमाधी मिळाली आणि 24 हजार टन वजनी जहाजे व युद्धनौका क्षतिग्रस्त झाल्या.
चवताळलेल्या पाकिस्तानी सेनेने या भागात नृशंस हत्याकांड करत असंख्य गावे जमीनदोस्त केली. हे हल्ले होण्याआधी पश्चिम पाकिस्तानच्या तीन डिव्हिजन्स (80 हजार सैनिक) पूर्व पाकिस्तानात सर्वदूर तैनात झाल्या होत्या. या स्फोटांनंतर लेफ्टनंट जनरल एएके नियाजीला आपले सैनिक सीमेवरून परत बोलवावेे लागले आणि मुक्ती वाहिनी सदस्यांवरचा सामरिक दबाव अचानक कमी होऊन स्वातंत्र्यासाठी लढणार्या त्या जांबाजांचा आत्मविश्वास द्विगुणित झाला. ऑपरेशन जॅकपॉटमुळे पाक लष्कराच्या दळणवळण प्रणालीला फार मोठा हादरा बसला. जसजसे दिवस जात होते तसतसे पाक लष्करात अराजकी वातावरण निर्मिती होऊ लागली. नागरी क्षेत्रावरील ताबा ढासळू लागला, मानसिक व सामरिक खच्चीकरण होऊ लागले. पुढे 3 डिसेंबर 1971 रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तिसर्या युद्धाचा ओनामा होऊन 16 डिसेंबरला पाकिस्तानच्या 93 हजार सैनिकांनी भारतीय सैन्यासमोर आत्मसमर्पण केले. या नौदल दिनानिमित्ताने बांगला देशातील पहिल्या नौदलीय कमांडो ऑपरेशनमधे सहभागी झालेल्या त्या सर्व वीर बांगला देशी व भारतीय नौसैनिकांना त्रिवार मुजरा.