देव, देश आणि धर्म रक्षणासाठी औरंगजेब बादशहाच्या 40 दिवस यातनामय शिक्षा भोगताना धर्मवीर शंभू राजांनी एक क्षणभरही रयतेच्या सुखाचा विसर होऊ न देता आपले बलिदान दिले. याच बलिदानाची प्रेरणा पुढे अटक ते कटक साम्राज्य विस्तारात झाली. 14 मे 1657 दिनी तेजस्वी योद्धा जन्मला, तो योद्धा म्हणजे शिवपुत्र संभाजी महाराज.
संभाजी महाराजांच्या लहानपणी मातृत्व हरपले तरी न डगमगता ते खंबीरपणे उभे राहिले. त्यांचे जीवनचरित्र अलौकीक आहे. त्यांच्या बलिदानाची गाथा जगभर गायली जाते. त्यांचे हिंदवी स्वराज्य व राष्ट्राप्रती दिलेले बलिदान या भूमीला प्रेरणा देणारे आहे. त्यांच्या अलौकीक पराक्रमाविषयी हिंदुस्थानच्या भूमीवर परकीय आक्रमणांपेक्षा फितुरीमुळे अनेक सत्ता पारतंत्र्यात गेल्या. हीच किड हिंदवी स्वराज्यात नांदत होती. वतनासाठी अनेकांनी मोगलांकडे स्वाभिमान गहाण ठेवला होता. मोगलांकडून रयतेची होणारी पिळवणूक, अत्याचार ही मंडळी उघड्या डोळ्यांनी पाहत होती. शिवशंभूंनी रयतेचे राज्य निर्माण करून समृद्धी उभी केली, पण याही स्वराज्याला फितुरीचे ग्रहण लागले आणि स्वराज्याच्या धाकल्या धन्यास औरंगजेबाच्या हाती दिले.
शिवरायांच्या पश्चात संभाजी महाराज दुसरे छत्रपती झाले. घरभेदी व परकीय आक्रमणांचा धामधुमीचा काळ त्यात वतन मागणारी नाराज मंडळी मात्र औरंगजेबाच्या पत्रव्यवहारातून औरंगजेबास भेटू लागली. यातूनच सह्याद्रीच्या अवघड वाटांचे मार्ग दाखवून औरंगजेबाचे सैन्य दख्खनेत उतरवले. यातूनच 1689 मध्ये शंभूराजे यांचा मेहुणा गणोजी शिर्के याने पन्हाळा भागात कवी कलशांवर हल्ला केला. याची खबर मिळताच शंभूराजे समाचार घेण्यास निघाले, हे समजताच शिर्के संगमेश्वरला आले.
त्यावेळी संभाजीराजांनी महत्त्वाच्या सरदारांची संगमेश्वर येथे बैठक बोलावली. ती संपवून राजे रायगडाकडे रवाना होत असतानाच शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रब खान यांनी संगमेश्वरवर गुप्त हल्ला केला. मराठे आणि शत्रूच्या सैन्यात चकमक झाली. प्रयत्नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. यात मुकर्रब खानाशी लढताना सरसेनापती मालोजी घोरपडे धारातीर्थी पडले. दगाबाजीने फास आवळले गेले. अखेर शत्रूने संभाजीराजांना व कवी कलशांना 1 फेब्रुवारी 1689 रोजी कैद केले.
बहादूर (धर्मवीर) गडावर औरंगजेबासमोर शंभूराजे व कवी कलश यांना हजर केले. “सर्व किल्ले स्वाधीन, खजिना व धर्मांतर केल्यास जीवदान!’ या गोष्टी पुढ्यात टाकल्या, पण स्वाभिमानी, धर्मनिष्ठ शंभूराजांनी गवताची काडीसुद्धा औरंगजेबास देणार नाही म्हणून स्वराज्य रक्षणासाठी या गोष्टी लाथाडल्या. त्यावेळी त्यांना अघोरी शिक्षा करण्यात आली. अनेक दिवसांचा यातनामय प्रवास शंभू राजे व कवी कलशांनी सोसला. वढू येथे शंभूराजे व कवी कलशांची समाधी बांधण्यात आली. पुढे हीच बलिदानाची गाथा मराठा साम्राज्य विस्ताराची प्रेरणा ठरली. धर्मवीर संभाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी आपला देह बलिदान केला. असे बलिदान जगाच्या पाठीवर क्वचितच असेल. 40 दिवसांच्या यातनामय प्रवासातून बलिदान झाले तो फाल्गुन आमावस्येचा दिवस (11 मार्च 1689) होय. या आमावस्येच्या दिवशी राष्ट्राभिमानी युवाशक्ती संभाजी महाराजांच्या वढू बु. ता. शिरूर, व तुळापूर ता. हवेली, पुणे येथील समाधीस्थळी नतमस्तक होताच आपल्या हृदयात प्रेरणा ज्योत प्रज्वलित होते.
शंभूराजे हे स्वराज्य रक्षक होते या शिवाय विविध पैलूंचा रथ होते. ते एक महान योद्धा होते. हिंदुत्वाचे महान रक्षक होते. अनेक लढाया जिंकणारे अपराजीत, संस्कृत पंडित, बहुभाषांवर प्रभुत्व गाजवणारे, 14व्या वर्षी बुधभुषण, नखशिखा, सातसतक ग्रंथ लिहिणारे राजे एकमेवाद्वितीय होय. जगातील पहिला तरंगता तोफखाना, जंजिरा जिंकण्यासाठी उसळत्या सागरात आठशे मीटरचा सेतू बांधणारे, आदिलशाही, कुतुबशाही बरोबर सिद्धी, पोर्तुगीज व इंग्रजांबरोबर मुघलांचा कर्दनकाळ ठरलेले, दुष्काळग्रस्त गावांत जल नियोजन, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि राजस्थान प्रांतातील लोकांनाही स्वराज्यासाठी एकत्र आणणारे, इतर धर्मांचा सन्मान, धर्मांतरावर कायदेशीर बंदी, बाल मजुरी व वेठबिगारी विरुद्धकायदा, देहू ते पंढरपूर आषाढीवारीला संरक्षण व अर्थ पुरवठा, शेतीसाठी पीककर्ज योजना, सैनिकांच्या उत्पन्नाला चरईची सवलत, सुसज्ज आरमार निर्मिती, आधुनिक बारुदखाने तयार करून स्वदेशीचा महामंत्र जपणारे, तसेच आपल्या बलिदानातून धर्मनिष्ठा, राष्ट्रनिष्ठा, मृत्यूवरही विजय प्राप्त करणारे राजे धर्मवीर ठरले.
– विठ्ठल वळसे पाटील