– अनिल जोशी
सुंदरलाल बहुगुणा हे नाव “चिपको आंदोलना’मुळे जगभर पोहोचले. पर्यावरण वाचवण्यासाठी त्यांनी आयुष्यभर दिलेला लढा आज प्रेरणादायी ठरत आहे.
सुंदरलाल बहुगुणा यांचा जन्म 9 जानेवारी 1927 रोजी टिहरी जिल्ह्यात भागीरथी नदीकिनारी वसलेल्या मरोडा गावी झाला. 13 वर्षांचे असताना अमर शहीद श्रीदेव सुमन यांच्या संपर्कात ते आल्यामुळे त्यांची जीवनाची दिशा बदलली. सुमन यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांनी बाल्यावस्थेतच स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. आयुष्यभर ते संघर्षच करीत राहिले आणि परिस्थितीशी झुंजत राहिले. मग ते झाडे वाचविण्यासाठीचे चिपको आंदोलन असो, टिहरी धरणाविरुद्धचे आंदोलन असो, दारूबंदीचे आंदोलन असो वा अन्य कोणतेही आंदोलन असो, ते नेहमी अग्रभागीच राहिले
चिपको आंदोलनाचे प्रणेते आणि पर्यावरणतज्ज्ञ सुंदरलाल बहुगुणा नेहमी म्हणत असत की, निसर्गात आपण जो बेसुमार हस्तक्षेप करीत आहोत, त्याचे दुष्परिणाम एक ना एक दिवस आपल्याला भोगावे लागणार आहेत. 1970 च्या दशकात जेव्हा चिपको आंदोलन जोमाने सुरू होते, त्यातून जगभराला मिळालेला पर्यावरण रक्षणाचा संदेशच त्यावेळी जागतिक पर्यावरण संरक्षण चळवळीचा पाया बनला.
परिस्थितिकी आणि आर्थिकी यांना एकमेकांपासून वेगळे करू नये, ही गोष्ट बहुगुणा यांनी नेहमीच सांगण्याचा प्रयत्न केला. स्थिर अर्थव्यवस्था ही स्थिर परिस्थितिकीवर अवलंबून असते. आज आपल्याला असे वाटू लागले आहे की, निसर्गाचे बेसुमार दोहन करून आपल्याला आपली अर्थव्यवस्था शिखरावर पोहोचविता येऊ शकेल; परंतु ही उंची गाठताना आपल्या पायाखालची जमीन मात्र घसरत आहे, याचे भान आपल्याला नाही. हीच बाब आता प्रकर्षाने समोर आली आहे. वाढत्या जागतिक तापमानाच्या बाबतीत आज जगभरात जी चर्चा होत आहे आणि जलवायू परिवर्तनाचा धोका आपल्यावर ज्या प्रकारे घिरट्या घालू लागला आहे, तो पाहता सुंदरलाल बहुगुणा म्हणत होते तो धोका हाच आहे, याची खात्री पटेल.
अन्न-वस्रापासून सर्वच बाबतीत त्यांच्या अंगी एवढा साधेपणा होता, की कोणत्याही प्रकारचे अवडंबर त्यांनी कधीच केले नाही. साधा आणि उच्च जीवनविचार त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वात नेहमी जाणवत असे. त्यांचे विचार अत्यंत स्पष्ट आणि सूक्ष्म होते. माणसाला आपल्या भोवतालचे पर्यावरण चांगले करण्याचा प्रयत्न सातत्याने केला पाहिजे, याच पायावर हे विचार आधारित होते. पर्यावरण हेच आपल्या जीवनाशी संबंधित प्रत्येक प्रश्नाचे सर्वांत मोठे उत्तर आहे आणि आपण दुर्दैवाने त्याचीच सर्वाधिक उपेक्षा केली आहे.
केवळ पर्यावरणच नव्हे तर देशासाठी प्राण पणाला लावणाऱ्या व्यक्तींविषयी त्यांच्या भावना काय होत्या, याचे एक उदाहरण माझ्याकडे आहे. एके दिवशी जेव्हा मी त्यांना भेटायला गेलो, तेव्हा त्यांचा उपवास आहे असे समजले. आज उपवास ठेवण्याचे कारण काय, असे मी त्यांना विचारले. त्यांनी मला सांगितले, “आज शहीद दिवस आहे.’ जो शहीद दिवस कुणाच्या लक्षातही राहात नाही, त्या दिवशी सुंदरलाल बहुगुणाजी उपवास करून देशासाठी प्राण त्यागणाऱ्यांना श्रद्धांजली वाहतात, हे पाहून मी आश्चर्यचकित झालो. गांधीजींच्या नंतर एवढे उपवास करणारी आणि एवढी बांधिलकीची जाणीव असलेली व्यक्ती झाली नाही, असे माझे स्पष्ट मत आहे.
नद्या, जंगले आणि निसर्गावर प्रेम करणारे बहुगुणा उत्तराखंडमध्ये विजेची गरज पूर्ण करण्यासाठी छोट्या-छोट्या योजना राबविल्या जाव्यात, या विचारांचे होते. त्यामुळेच टिहरी धरणासारख्या मोठ्या धरण प्रकल्पांना त्यांचा विरोध होता. त्यांच्याशी बोलताना विषय कोणताही घेतला, तरी सरतेशेवटी संभाषण पर्यावरण आणि निसर्गाच्याच विषयाकडे वळत असे. त्यांचे हृदय, त्यांचा मेंदू आणि त्यांच्या रोमारोमात निसर्गाविषयीचा सन्मान आणि संरक्षणाची भावना होती. आपल्या कार्याने त्यांनी अनेकांना प्रेरित केले. ते आपल्या कामात नेहमी तल्लीन असल्याचे पाहायला मिळत असे. पर्यावरण संरक्षणाशी त्यांची पक्की बांधिलकी होती.
सुंदरलाल बहुगुणा यांचा सत्याग्रह केवळ उत्तराखंडपुरता मर्यादित नव्हता. ते मोठ्या धरण प्रकल्पांचे विरोधक होते आणि मोठ्या धरणांविरोधात देशभरात झालेल्या आंदोलनांमध्ये त्यांनी सहभाग घेतला किंवा आंदोलकांना प्रेरित केले. 1980 च्या दशकाच्या मध्यात छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यातील भोपालपटनम येथे आणि त्याच्यालगत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील इचमपल्ली येथे प्रस्तावित दोन धरणांविरुद्ध आदिवासींनी मोठे आंदोलन केले होते. 9 एप्रिल 1984 रोजी या “मानव बचाओ, जंगल बचाओ’ आंदोलनांतर्गत हजारो आदिवासी पायी चालत गडचिरोलीच्या मुख्यालयात पोहोचले होते. आदिवासींचे नेते श्याम शाह आणि सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांच्यासह या आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी चिपको आंदोलनाचे प्रवर्तक सुंदरलाल बहुगुणाही खास उपस्थित होते. टिहरीपासून सुमारे 1800 किलोमीटरवर असलेल्या गडचिरोलीमध्ये त्यांच्या उपस्थितीमुळे आंदोलनाला जोर चढला होता.
चिपको आंदोलनाविषयी एका मुलाखतीत त्यांना विचारण्यात आले की, झाडे वाचविण्यासाठी हा अनोखा मार्ग तुम्हाला कसा सुचला? त्यावेळी त्यांनी जे उत्तर दिले त्यातून त्यांच्या जीवनाचे सार प्रकट होते. ते म्हणाले होते, “क्या है जंगल का उपकार, मिट्टी पानी का बयार। मिट्टी, पानी और बयार है जीने का आधार।’ याचा अर्थ असा की, जंगलांनी आपल्याला शुद्ध माती, पाणी आणि हवा दिली आहे. हे घटक जीवनासाठी अत्यावश्यक आहेत. त्यांनी सांगितले होते की, चिपको आंदोलन मुख्यत्वे डोंगराळ भागातील महिलांनी सुरू केले होते. महिला घोषणा देत असत, “लाठी गोली खाएंगे, अपने पेड बचाएंगे.’ 21 मे 2021 रोजी वयाच्या 94व्या वर्षी सुंदरलाल बहुगुणा यांचे निधन झाले. त्यांच्या कार्याचा अभ्यास करून त्यांनी सुचविलेल्या मार्गावरून चालायला पाहिजे. निसर्ग तसेच पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करायला हवी.