ना. चंद्रकांत पाटील यांच्याकडून मान्यता
वाईच्या पश्चिम भागाला दिलासा
कवठे – धोम धरणाच्या निर्मितीपासून मागणी असलेल्या जोर आणि जांभळी खोऱ्याला जोडणाऱ्या पुलासाठी नाबार्डमधून निधी देत असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माजी आमदार मदन भोसले यांना दिली. गेली अनेक वर्ष मागणी असलेला हा प्रश्न मार्गी लागल्याने पश्चिम भागातून समाधान व्यक्त होत आहे.
माजी आमदार मदन भोसले यांच्या नेतृत्वाखाली वाई तालुक्यातील शिष्टमंडळाने या प्रश्नाबाबत मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. यावेळी मदन भोसले यांनी सांगितले, की धोम धरणाच्या निर्मितीत या दोन्ही खोऱ्यातील जनतेने मोठा त्याग केला आहे. धरणाच्या निर्मितीने या दोन्ही खोऱ्यांना वेगवेगळे केले. या दोन्ही खोऱ्यातील जनतेला परस्पर ठिकाणी येण्या-जाण्यासाठी तब्बल 60 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे धोम धरणाच्या भिंतीखाली दोन्ही खोऱ्यांना जोडणारा हा पूल व्हावा यासाठी आपण वारंवार मागणी करत आहोत.
याबाबतचा पत्रव्यवहारदेखील मदन भोसले यांनी सादर करुन या कामास प्रशासकीय मंजुरी मिळवण्यात यश आले. मात्र निधी मिळाला नसल्याचे सांगितले. या प्रश्नाची निकड त्यांनी स्पष्ट करुन हा प्रश्न मार्गी लागल्यास वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील जनतेला न्याय मिळेल, असे सांगितले. त्यावर मंत्री पाटील यांनी याबाबतचे निवेदन ज्यावेळी दिले त्याचवेळी आपण त्यावर कसा निधी टाकता येईल याचा विचार केला. नुकतेच नाबार्डकडून या निधी उपलब्ध झाला असून या निधीतून या पुलाच्या कामासाठी निधी देत आहे. तुमचे कोणतेच काम रेंगाळत राहणार नाही, असेही मंत्री पाटील यांनी भोसले यांना सांगितले.
मंत्री पाटील यांच्या या तत्परतेबद्दल मदन भोसले यांनी त्यांना धन्यवाद देत आभार मानले. जोर आणि जांभळी खोऱ्याला जोडणाऱ्या या पुलामुळे स्थानिक जनतेची मोठी सोय होणार असून या भागातील पर्यटनवाढीसही चालना मिळणार आहे. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, केतन भोसले, यशराज भोसले, ईशान भोसले, पंचायत समिती सदस्य दिपक ननावरे, नगरसेवक सतिश वैराट, राज्य मजूर फेडरेशनचे संचालक सतिश भोसले, बावधन ग्रा. पं. सदस्य सचिन पाटील, सागर मांढरे, विजयकुमार रासकर, युवराज जगताप, शेखर घोणे, संदिप घोरपडे, भाजपाचे उद्योग आघाडीचे तालुकाध्यक्ष दत्ता ढेकाणे, यशवंत लेले, जितेंद्र वारागडे, विनोद जाधव उपस्थित होते.