– अरुण गोखले
हरीण एक अतिशय चपळ प्राणी, पण तितकाच भित्राही. जरा का कुठे खुट्ट झाले, की हा लागलाच जीव वाचवण्यासाठी पळायला. एरव्ही शिकाऱ्याला सहज हुलकावण्या देणारे हरीण हे मात्र गुंतून पडते ते नादात. संगीत श्रवणाचा आनंद घेताना आपल्या जीवावर बेततेय याचंही त्याला भान नसतं. तिथं तो जीव भुलतो आणि शिकाऱ्याची शिकार होतो.
या प्राण्याची दुसरी गोष्ट म्हणजे गवत खाऊन तहान लागली की हा जीव पाण्याच्या शोधात बाहेर पडतो. त्याला दूरवर पाणी दिसतं. तो त्या पाण्यासाठी धावत सुटतो. तो जितका पुढे जाईल, तितके ते पाणीही पुढे पुढे जाते. कारण, ते पाणी नसतेच. ते असते मृगजळ. त्या खोट्या मृगजळामागे ऊर फुटेपर्यंत धावूनही त्याची तहान पूर्ण होत नाही.
हरणाचं निरीक्षण करताना श्री दत्तात्रयांना या प्राण्यात आणि संसारात सुख शोधत भटकणाऱ्या जीवात कुठेतरी साम्य आढळले. म्हणूनच त्यालाही गुरू मानून आपण काय शिकलो. हे आपल्या मातेस सांगताना श्री दत्तात्रय म्हणतात की, माते! मी हरणाला गुरू मानून त्याच्याकडून हेच शिकलो, की या मायेच्या मृगजळामागे न धावता जीव जर सद्गुरूंना शरण गेला तर त्यांची खरी तृष्णा पूर्ण होईल.
पण जर का मनुष्य हा त्या हरणाप्रमाणेच नाही त्या नादास भुलला, आपल्या आत्मकल्याणापासून दूर गेला तर टपलेला शिकारीरूपी काळ हा त्याची सहजपणे शिकार करतो. नादाला भुलू नये, नादात अडकू नये, गाफिल राहू नये या गोष्टी आपल्याला हरणाकडूनच शिकायला मिळतात. एका सुवर्ण मृगाच्या सीतेच्या हव्यासापायी पुढे केवढे मोठे रामायण घडले ते विसरून कसे चालेल.
हरणाचा उल्लेख हा परमार्थात किंवा अध्यात्मात आपल्याला हेच सांगण्या आणि शिकवण्यासाठी केला जातो, की कस्तुरी मृगाच्या नाभीत ती कस्तुरी असते. पण तो मात्र रानोमाळ त्या सुगंधचा शोध घेत फिरत असतो.तसाच तो परमात्मा हा प्रत्येक माणसाच्या अंतरंगात असून हे आपण मात्र त्याला न पाहता देव कुठे आहे असे म्हणून त्यास बाह्य जगात शोधत फिरतो. तुझे आहे तुजपाशी। परी जागा चुकलासी।। हे सांगण्यासाठी साधू, संत, सद्गुरू हे या प्राण्याचा नेहमी दाखला देतात.