– प्रा. डॉ. विठ्ठल जायभाये
निवृत्त प्राचार्य डॉ. बाबा बोराडे यांचा नुकतेच “तीर्थंकर भगवान महावीर वर्धमान’ हा महत्त्वपूर्ण ग्रंथ प्रकाशित केला आहे. मिलिंद काटे यांच्या अनुराधा प्रकाशनाने हा ग्रंथ प्रकाशित केला आहे. दया, प्रेम, शांती, जिव्हाळा, आपुलकी हे केवळ पुस्तकात वाचायला मिळत असताना महापुरुषांच्या शांततापूर्ण विचारांचे सिंचन होऊन नव्या पिढीतील सर्वच सृजनांनी तीर्थंकर भगवान महावीर समजून घ्यावेत.
“तीर्थंकर भगवान महावीर वर्धमान’ लिहिताना डॉ. बोराडेंना आपल्या भोवतालच्या जैन लोकांच्या व्यासंगाने जैन धर्म, तत्त्वे, विविध तीर्थंकर आणि त्यांच्या कार्य-कर्तृत्वाविषयी कुतूहल निर्माण झाले. प्रस्तुत ग्रंथ एकूण पाच प्रकरणामध्ये लिहिलेल्या ग्रंथास व्यासंगी संशोधक प्रा. डॉ. विजय पाटील यांचा महत्त्वपूर्ण अभिप्राय, सुप्रसिद्ध कवयित्री सुनंदा शिंगनाथ यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना आणि मिलिंद काटे यांनी विवेकशील चिंतनाने केलेली पाठराखण हे या पुस्तकाचे महत्त्वपूर्ण भाग आहेत.
पहिल्या प्रकरणात जैन धर्माचा इतिहास लेखन करताना त्यांनी मानवाच्या उत्पत्तीपासून, सिंधू संस्कृती ते कुलकर किंवा मनुपर्यंत विश्लेषण करताना जैन धर्मातील चोवीस तीर्थंकर, बारा चक्रवर्ती, नऊ बलभद्र, नऊ वासुदेव वगैरे बाबींचे चित्रण केले आहे. जन म्हणजे सामान्य लोक, जैन म्हणजे जैन धर्माच्या मार्गाने चालणारा आणि जीन म्हणजेच स्वतःच्या इंद्रियांना जिंकणारा. ही जैन धर्मातील सर्वोच्च अवस्था आहे.
ज्या जीवाचे मानसिक, वाचिक, कायिक विचार-व्यवहार शुद्ध आहेत ती व्यक्ती धर्म किंवा मतभेद विरहीत जीन होतो, असे लिहून बोराडे, जैन धर्म हा एक शाश्वत धर्म आहे असे सांगतात. त्यानंतर बोराडे सर्वच चोवीस तीर्थंकारांची माहिती देतात. माणसातच देव आहे, अनेकांत सिद्धांत, औदार्य, अहिंसा, कर्म मुक्ती देणारा जैन धर्म आहे. सहनशील, संयम, सहकार्य, सहअस्तित्व, श्रमण, आनंदी व्यावहारिक जीवन, अध्यात्मिक चेतना इत्यादी शिकवण देणारा जैन धर्म आहे. याशिवाय अहिंसा परमो धर्म, स्यादवाद, पंचमहावृत्ते, तीन गुणवृत्ते, चार शिक्षावृत्ते आणि जैन धर्मातील पंथाचे विश्लेषण इथे आले आहे.
त्यानंतर भगवान महावीर यांचे जीवन-चरित्र-कार्याचा विस्ताराने उल्लेख आहे. शेवटच्या प्रकरणात भगवान महावीरांचे तत्त्वाचरण यावर लिहिले असून त्यानंतर महावीर वर्धमानानंतर जैन धर्मात काय काय स्थित्यंतरे झाली त्यात सहा आचार्य, तीन मुख्य परंपरा आणि काही ऐतिहासिक तथ्ये मांडताना भारतभर, जगभर जैनधर्म आपल्या अनमोल तत्त्वांनी कसा सर्वमान्य झाला याचे विवेचन आले आहे. शेवटी जगभरातील 238 जैन तीर्थ आणि संदर्भ सूचीने हा संक्षिप्त ग्रंथ थांबतो.
सांप्रतकाळी क्रोध, असहिष्णुता, असहकार, कट्टरता, उतावीळपणा वाढल्यामुळे माणसा-माणसातील संवाद खुंटला आहे. तेव्हा शांती, सहकार, प्रेम, वात्सल्य, आपुलकी, जिव्हाळा, सहिष्णुतेची जगाला नितांत अवश्यकता असून त्यासाठी जैन धर्माच्या शांती, अहिंसा, सहकार, सहअस्तित्व, सन्मान इत्यादी वैश्विक तत्त्वांची समाजात पुन्हा रुजवणूक होण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यासाठी “तीर्थंकर भगवान महावीर वर्धमान’ हा छोटासा ग्रंथ प्रत्येकाने वाचून नक्की संग्रही ठेवावा व आपल्या जीवनात रुजवावा.