– अरुण गोखले
नित्य दिवाळी! इथे सर्वसामान्य माणसाच्या मनात असा विचार येतो की ही नित्य दिवाळी म्हणजे काय? ती आमच्या जीवनात कशी येणार? कारण, आम्ही तर फक्त राजालाच रोज दिवाळी हेच ऐकून आणि वाचून आहोत. खरोखरच अशी दिवाळी ही मानवी जीवनात येते का? येत असेल तर कशी? इथं या मार्गदर्शक लोकांचा आपल्याला असा प्रश्न असतो की,
बाबारे तुझी दिवाळीची नेमकी कल्पना ही काय आहे? तुला चार दिवसांचा बाहेरच्या दिव्यांचा झगमगाट हवा आहे का तुला तुझ्या जीवनात सदैव सुखाची वाट दाखविणारा ज्ञानदीप. जर आपलं जीवन हे खऱ्या अर्थाने उजळून जायला हवं असेल ते सुखमय व्हायला हवं. त्यासाठी प्रत्येकाच्या जीवनात ज्ञानाचे, संत बोधाचे, विवेकाचे दीप लागणे, ते उजळणे आणि जीवनाची वाट प्रकाशमान होणे आवश्यक आहे.
त्यासाठी सर्वात प्रथम जर गरज कशाची असेल तर ती म्हणजे जीवनातील अज्ञान दूर करणाऱ्या ज्ञानाची. शिक्षणाचा दीप हा प्रत्येकाच्या जीवनात लागायला हवा. शिक्षण माणसाला विद्या, कला, कौशल्य, गुण देते. त्यामुळे माणसाला त्याच्या जीवन चरितार्थासाठी लागणारा पैसा, धन हे कमविण्याचे नोकरी व्यवसाय, धंदा किंवा कला प्रगटीकरणाची दारे उघडली जातात. जीवनात माणसाला आवश्यक ते अर्थ (पैसा) त्यास मिळाला की त्याच्या जीवनात आपोआप सुखाच्या पावलांनी लक्ष्मी घरात येते.त्याचं घर आनंदाने, सुख, सौख्याने भरून जाते.
या लौकिक सुखाच्या बरोबरच जीवाच्या खऱ्या सुखा समाधानासाठी त्यास परमार्थाचे दार उघडून द्यायला आणि त्यास त्याच्या जीवानाची सार्थकता साधायला साधी, सोपी भक्तीची वाट ही संत बोधाची ज्ञानज्योतच दाखवीत असते. संत जीवास जीवनातला सुखानंद हा कसा भोगायचा आणि नित्य समाधानाची दिवाळी कशी साजरी करायची ती जीवनकला शिकवीत असतात. ज्या जीवास ही सुखे संतोषा न यावे। दु:खे विषेदा न मानावे। लाभालाभ न धरावे। मनामाजी।। हे जीवनकला साधते त्यास नित्य दिवाळीचा अनुभव आल्या शिवाय राहात नाही.