– डी. एस. काटे
आज लक्ष्मीपूजन. आज अनेकजण लक्ष्मीची अर्थात पैशाची मनोभावे पूजा करतील. मात्र, ही पूजा करताना आपला पैसा हा सद्मार्गानेच कमावलेला असावा, अशी खूणगाठ मनाशी बांधा.
भारतात साजरा होणारा सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी अर्थात दीपावली. या शुभ मुहुर्तावर विशेष लक्ष्मीपूजन म्हणजेच कमवलेला पैसा याची विधिवत पूजा करणे हा मुख्य उद्देश असतो. पण आपण पूजन करतो ते धन किंवा पैसा काळा आहे की पांढरा याचे भान असावे? पांढऱ्या पैशाने केलेले लक्ष्मीपूजनाने जीवन सार्थक व आरोग्यवर्धक असेलच. हजारो वर्षांपूर्वी वस्तुरूपाने मानवाच्या गरजा पुरवण्यासाठी व्यवहार होत असत. पुढे मानवाने आपल्या भौतिक सुखासाठी शोध तंत्रज्ञान याद्वारे सुविधा मिळण्यास सुरुवात केली. आपली लालसा वाढत गेल्याने चलन व पैसा याची निकड निर्माण होत गेली. यामुळेच मनुष्याच्या जीवन स्थानी पैशाचे महत्त्व स्थित झाले.
पैसा कमावण्याची चढाओढ अर्थात स्पर्धा जगभर सुरू झाली. मग तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने मिळवणे हा एकच उद्देश सर्वत्र दिसून येत आहे. या स्पर्धेतून बेकायदेशीरपणे माया जमवण्याचा प्रयत्न अनेक जण करतात. यात मुख्यतः भ्रष्टाचार, कर बुडवणे, बेकायदा व्यापार अशा अनेक प्रकारांचा समावेश होतो. पैशाची लालसा ही सर्प विषापेक्षाही विषारी असते. एक वेळेस सापाचे विष उतरेल पण काळा पैसा कमावण्याची वृत्ती जतन केलेल्यांची आस कधीही पूर्ण होत नाही.
किचकट सरकारी नियम, प्रशासकीय भ्रष्ट व्यवस्था तसेच जटिल कायदे यामुळे कर व्यवस्थेत सामान्य मनुष्य भरडला जात आहे. मग तो कर भरण्यापासून दूर जातो आणि एक वेळेस त्यालाही वाटते की आपण सत्य मार्गाने हे सर्व करत असताना काळा पैसा कमवणाऱ्यांना मात्र प्रतिष्ठा का मिळत जाते? मग तो नैराश्यात जगत जातो, सरकारला नोकरी-व्यवसाय यांच्या कमाईचा हिशेब दाखवून. निव्वळ नफ्याचा हिशेब करून कर भरणा केला जातो. उर्वरित रक्कम म्हणजे पांढरा पैसा होतो.
जनतेच्या कराद्वारे मिळालेल्या रकमेतून सरकारी गाडा चालवला जातो, पण अनेक योजना राबवताना सरकारी योजनेत भ्रष्टाचार होतात. जनतेने भरलेला कर रकमेचा परत अवैध मार्गाने काळा पैसा तयार होतो. यास अर्थशास्त्राच्या भाषेत चक्रनेमिक्रमेण असे संबोधतात. अर्थात, ज्याद्वारे आपण सरकारला कर भरतो आणि सर्व उत्पादनाचे स्रोत दाखवून निश्चिंत होतो. पण काही लोक अवैध मार्गाने स्वतःच्या पैशाचे संकलन करतात तोच काळा पैसा नंबर दोनचा पैसा असेही संबोधले जाते. मग नंबर एक नंबर दोन असे व्यवहाराचे प्रकार स्थित झालेले आहेत. पैसा हे माध्यम एकच पण त्याचे रूप काळा किंवा पांढरा पैसा असेच आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेत जवळजवळ 50 टक्क्यांपर्यंत काळ्या पैशाचे व्यवहार होतात आणि हाच काळा पैसा अर्थव्यवस्थेच्या वाढीला खीळ बसवतो. पण एकंदरीत काळ्या पैशाची अर्थव्यवस्था ही खऱ्या अर्थव्यवस्थेपेक्षाही वेगाने वाढते. हिरे-सोने व्यवसायात काळ्या पैशाचा वापर सर्रास केला जातो. अनेक गर्भश्रीमंताची काळी माया या व्यवसायात भांडवल म्हणून वावरत आहे. बाजारात त्याचबरोबर अर्थव्यवस्थेत काळ्या पैशाचा सुळसुळाट निर्माण झाल्यानंतर सरकार त्या पैशावर आवर घालण्यासाठी सोयीस्कर पडणे यासाठी आयकराद्वारे काही योजना राबवतात त्याद्वारे संपत्ती घोषित करून त्यावर कर भरला जातो.
म्हणजेच काळा पैसा पांढरा करण्याचे हे उद्योग आहे हे विशेष. अशा नकली चलनामुळे खोटारडेपणा, घोटाळे, खंडणी, मानवी तस्करी, लैंगिक शोषण, ब्लॅकमेलिंग, चोरी, दरोडा, भ्रष्टाचार अशी समाजविरोधी कृत्य समाजात वाढत चालतात. अशा नागरिकांची वागणूक नैतिक व सामाजिक मूल्यात घट दर्शवणारी असते. धनसंचय करताना आकस, वाईट कर्म करून कमवलेली माया कधीही शुद्ध धनप्राप्ती होऊ शकत नाही, यातूनच सुख-शांती व आरोग्य निश्चितच गमावले जाते. नैतिकता ही संपत्ती मिळवण्याचा आधार आणि सुखप्राप्ती हेच त्याचे फळ आहे. म्हणून संपत्तीची प्राप्ती नैतिकतेशी निगडित असते.
वाममार्गाने कमावलेला पैसा मनुष्याला व्यसनाधीनता, मगरुरी, निष्काळजीपणा, अहंकार, बेशिस्त अशा दुर्गुणांसाठीही कारणीभूत ठरतो. दुसऱ्याचे शोषण करून किंवा भ्रष्टाचार व अवैध मार्गाने कमवलेला पैसा कदापिही सुख शांती देत नाही. चांगल्या मार्गाने वापर करून मिळवलेले धन चिरकाल टिकते. वैध व्यावहारिक मार्गाने समाजोपयोगी कर्म करून खऱ्या मार्गाने पैसे कमावणे आणि त्यावर योग्य तो कर भरणे ही पथ्य पाळून, आपण शुद्ध धनाचे अर्थात पांढऱ्या पैशाद्वारेच लक्ष्मीपूजन करूया.