पिंपरी -राज्यात सत्तेपासून दूर ठेवल्याची मनात सल असल्यामुळे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी किरीट सोमय्या यांना आरोप करण्यासाठी पुढे केले आहे. सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर राजकीय सुडबुध्दीने आरोप केले आहेत, अशी टीका भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी केले आहेत.
लांडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, यापूर्वी सोमय्या यांनी ज्यांच्यावर आरोप केले, ते नेते आज भाजपात जाऊन पवित्र झाले का? या आरोपाचे पुढे काय झाले याचे सोमय्यानी स्पष्टीकरण द्यावे. सोमय्यांच्या आडून सुडाचे राजकारण करणाऱ्या भाजपा नेत्यांना राज्यातील जनता कदापि भीक घालणार नाही.
वरिष्ठ नेत्यांना खुश करण्यासाठी सोमय्या महाविकास आघाडीतील नेत्यांवर बेछूट आरोप करत आहे. या आरोपात कोणतेही तथ्थ्य नसून यापूर्वीही त्यांनी अनेक नेत्यांवर असे आरोप केले आहेत. 2017 मध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे कॉंग्रेसमध्ये असताना त्यांच्यावर 300 कोटींच्या मनि लॉण्ड्रिंगचा आरोप केला. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्यावर पॉन्झी स्किमच्या माध्यमातून 10 लाख लोकांची फसवणूक केल्याचा आरोप केला.
माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांच्यावर देखील घोटाळ्याचे आरोप केले. भाजपात गेल्यानंतर हे पवित्र झाले का? यांच्यावरील आरोपाचे काय झाले ? याचे उत्तर सोमय्यानी द्यावे. आरोप केल्यानंतर मॅनेज होणाऱ्या सोमय्यानी अजितदादांबद्दल बोलाताना दहावेळा विचार करावा, असा इशारा माजी आमदार लांडे यांनी दिला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या भ्रष्ट पदाधिकाऱ्यांनी लोकांच्या पैशांवर दिवसाढवळ्या हात मारला असून येत्या महापालिका निवडणुकीत जनता त्यांना सोडणार नाही. त्यावेळी खरे भ्रष्टाचारी कोण हे समोर येईल. भ्रामक आणि खोट्या गोष्टी सांगून सत्ताधाऱ्यांनी जनतेची दिशाभूल केली. खोटं बोल पण रेटून बोल ही पद्धत आता चालणार नाही. येणाऱ्या निवडणुकीत जनताच सत्ताधाऱ्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असे माजी आमदार लांडे म्हणाले आहेत.