सातारा – कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ गुंतले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संपूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असून 13 कोटी जनतेचे प्रतिनिधी आहेत. त्यामुळे त्यांनी विधानसभा निवडणुकांच्या प्रचारापेक्षा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सुटतील याकडे लक्ष द्यावे, असा मार्मिक टोला विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.
येथील शासकीय विश्रामगृहात अजित पवार यांनी आज पत्रकारांशी विविध विषयांवर संवाद साधला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा साडेतीन जिल्ह्याचा पक्ष असून हे पार्सल पुन्हा महाराष्ट्रात पाठवले जावे, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या प्रश्नावर अजितदादा म्हणाले, “”ही सर्व निवडणुकांच्या काळातील प्रचारार्थी विधाने असतात.
अशी विधाने फारसे गांभीर्याने घ्यायची नसतात. कोणतेही सरकार कसे म्हणेल आम्हाला धोका आहे. राज्य शासनाचा येथील प्रशासनावर प्रचंड दबाव आहे. 31 मार्चअखेर ठेकेदारांनी केलेल्या कामांची बिलेसुद्धा त्यांना अद्याप मिळाली नाहीत. राज्याची आर्थिक अवस्था बिकट आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था गंभीर असून सातारा जिल्ह्यातही तशीच अवस्था आहे.
कधीतरी तुमच्या जवळच्या कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याला विश्वासात घेऊन नक्की राज्य शासनाचे काय चालले आहे हे विचारा, म्हणजे तुम्हाला खरी परिस्थिती लक्षात येईल.” कोरेगाव पोलीस ठाण्याला पोलीस निरीक्षक पद मंजूर असताना येथे यायला सुद्धा कोणी तयार नाही यावरूनच दबावाचे राजकारण काय आहे हे लक्षात येते, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. मुख्यमंत्र्यांनी कर्नाटक विधानसभेच्या प्रचारात गुंतण्यापेक्षा बांधावर जाऊन बळीराजाचे प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडवले पाहिजेत. निधी उपलब्ध नसेल तर वित्त विभागाशी बसून ते प्रश्न चर्चा करून सोडवायला पाहिजेत, असा टोला पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
स्ट्रॉबेरी पाहून कधी शेती होते का?
महाबळेश्वर येथे 28 मे रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. याबाबत अजित पवार म्हणाले, “”चांगली गोष्ट आहे. राज्यासंदर्भात कोणते धोरणात्मक निर्णय घ्यायचे असतील तर ते अतिशय शांतपणे आणि विचार करून घ्यावे लागतात. त्यासाठी अभ्यागतांची सातत्याने असणारी वर्दळ टाळून शांत ठिकाणी एखादे अधिवेशन घेतले जाणे गरजेचे असते.” 16 आमदारांच्या अपात्रता निकालासंदर्भात ते म्हणाले, “”या निकालाची आपण वर्षभर वाट बघतोय. हा विलंब का झाला हे सुद्धा एक कोडं आहे.’ दरम्यान, “मुख्यमंत्री शिंदे साताऱ्यात त्यांच्या गावी येऊन दोन तीन दिवस राहतात. काय करतात तर शेती करतोय. स्ट्रॉबेरी पाहून कधी शेती होते का, असा प्रश्न करुन श्री. पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या शेती करण्याची टिंगल उडवली.