कोपरगाव, (प्रतिनिधी) – आज वर्गावर्गांतून मुलींची संख्या अधिक दिसत आहे. मुली सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहेत. असे असूनही स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही निर्भय कन्या अभियानसारखे कार्यक्रम राबविण्याची वेळ येते. याचे कारण मुलींना करिअर मार्गावर पुढे जाताना समाजाचा पाठिंबा मिळत नाही. मुलगी म्हणून तिला अनेक बंधने लादली जातात. समाजाचा पाठिंबा मिळाल्यास मुली नक्कीच निर्भया बनतील, असे प्रतिपादन कॉलेज विकास समितीच्या चेअरमन चैताली काळे यांनी केले.
येथील एस. एस. जी. एम. कॉलेजच्या विद्यार्थी विकास मंडळ आणि महिला कल्याण व स्त्री सबलीकरण समिती अंतर्गत निर्भय कन्या अभियान कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून चैताली काळे बोलत होत्या. या कार्यक्रमात ॲड. शंतनुराव धोर्डे व डॉ.रेणुका बनकर यांचीही व्याख्याने झाली. कायदेतज्ज्ञ शंतनुराव धोर्डे यांनी दिल्ली निर्भया प्रकरणाला उजाळा देऊन पॉस्को कायद्याची निर्मिती व अंमलबजावणी कशी झाली हे सांगितले.
डॉ.रेणुका बनकर यांनी आहार, आरोग्य आणि आत्मविश्वास या त्रिसूत्रीतील सहसंबंध स्पष्ट करून यावरच आत्मविश्वास, आत्मनिर्भरता अवलंबून असल्याचे दाखवून दिले.अशोक शिंदे यांनी स्वसंरक्षण कसे करावे? याविषयी सांगून प्रात्यक्षिकाद्वारे बचाव व स्वसंरक्षणाचे धडे दिले. महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. आर. आर.
सानप यांनी अध्यक्षस्थान भूषविले. कला विभागाच्या उपप्राचार्या प्रा. उज्ज्वला भोर यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थी विकास मंडळाचे प्रमुख डॉ. माधव यशवंत यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ. वैशाली सुपेकर, डॉ.योगेश दाणे, प्रा.चव्हाण, प्रा लोहोकणे, प्रा. पेटारे, प्रा.जयश्री शेंडगे इत्यादींनी परिश्रम घेतले.