श्रीरामपूर, (प्रतिनिधी)- भंडारदरा लाभक्षेत्रातील श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने पाट पाणी द्या, अशी मागणी श्रीरामपूर विधानसभा काँग्रेसच्या वतीने जिल्हा बँकेचे संचालक व माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता स्वप्निल काळे यांना केली. यावर काळे यांनी उद्यापासून पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्याचे आश्वासन दिले. कोणीही शेतकरी पाट पाण्यापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही दिली.
ससाणे म्हणाले की, सध्या तीव्र उन्हाळ्याबरोबर सर्वत्र भूजल पातळी खालावलेली आहे. त्यामुळे भंडारदरा लाभक्षेत्रातील श्रीरामपूरातील शेतकऱ्यांना पाट पाण्याची मोठी गरज आहे. सध्या उन्हाळ्याचे आवर्तन सुरू असूनही, अत्यंत कमी दाबाने शेतकऱ्यांना पाणी दिले जात आहे. पूर्ण दाबाने पाणी मिळत नसल्याने या महत्त्वाच्या आवर्तनाचा शेतकऱ्यांना लाभ घेणे मुश्किल झाले आहे.
श्रीरामपूर तालुका लाभक्षेत्रात सर्वात टेलला आहे, कालवा सल्लागार समितीमध्ये ठरल्याप्रमाणे सर्वात अगोदर टेलचे भरणे काढून, नंतर वरच्या लोकांना पाणी देणे नियमानुसार बंधनकारक आहे. असे असतानाही चुकीच्या पद्धतीने आवर्तन सोडल्यामुळे आवर्तनाचे पाणी मिळेल की नाही, याबाबत शेतकरी चिंतातूर आहे.
सध्या पिण्याचे पाणी व पिकासाठी पाण्याची नितांत गरज असल्यामुळे कोणताही शेतकरी पाटपाण्यापासून वंचित राहिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही ससाणे यांनी दिला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने पाणी द्यावे. ससाणे यांच्या मागणीवरून जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता स्वप्निल काळे यांनी उद्यापासून पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्याचे आश्वासन दिले.
कोणीही शेतकरी पाटपाण्यापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही दिली. यावेळी जि.प. चे माजी सभापती बाबासाहेब दिघे, कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीरामपूरचे सभापती सुधीर नवले, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस हेमंत ओगले उपस्थित होते.