श्रीगोंदा, (प्रतिनिधी) – तालुक्यातील काष्टी परिसराला बुधवारी (दि.२२) दुपारी जोरदार वादळाचा तडाखा बसला. या वादळामुळे मोठे नुकसान झाले असून झाडे व विजेचे खांब रस्त्यावर पडल्याने नगर-दौंड महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
गेल्या आठवडाभरापासून तालुक्याच्या बहुतांश भागाला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा फटका बसला आहे. बुधवारी दुपारी काष्टी व परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या वादळामुळे नगर-दौंड महामार्गावर स्वामी समर्थ केंद्राजवळ झाडे आणि विजेचे खांब पडले.
त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. ग्रामस्थ व प्रवाशांनी रस्त्यावरील झाडे आणि खांब हटवून वाहतूक सुरळित केली. त्याचबरोबर अनेकांच्या घराचे तसेच जनावरांच्या गोठ्याचे पत्र उडून गेले. संतवाडी परिसरातील एका घराचे पत्रे उडून ते काही फूट अंतरावर जाऊन पडल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
त्याचबरोबर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली. विजेचे खांब व तारांचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समजली. शेतीपिकेही जमीनदोस्त झाली. अचानक जोराचा सुरू झाल्याने एका हॉटेलमधील खुर्च्या अक्षरशः हवेत उडाल्या. अनेक दुकानांचे फलक कोसळले.