प्रसंग 1
दैनिक वृत्तपत्र कार्यालय आज गजबजून गेले होते. बरीच गर्दी दिसत होती, कार्यालयामधील संपादक साहेब, पत्रकार आणि इतर सर्व तांत्रिक बाबी संभाळणारे सहकारी थोड्याशा आश्चर्याने गर्दीकडे पाहात होते. तेवढ्यात संपादक साहेबांनी आलेल्या सर्व जणांचे स्वागत केले. जोशी काका, नानासाहेब, अण्णा तसेच वेळात वेळ काढून मनुताई, देशमुख ताई व त्यांचे सर्व इतर समवयस्क स्नेही जणांचा मेळाच सुरू झाला. आम्ही सर्व वय-परत्वे निवृत्त झालो तरी, आमच्यातील बालपण प्रत्येक बऱ्या-वाईट प्रसंगामध्ये टिकवून आहोत.
संपादक साहेब सर्वांची ओळख करून देत-घेत होते. आज आम्ही सर्व मुद्दाम वेळ काढून आपला वेळ द्यायला आलो आहोत. असे म्हणतच सर्व जणांनी पुष्पगुच्छ, मिठाई व इतर भेटवस्तू पिशवीतून बाहेर काढत वृत्तपत्र परिवारातील सर्व सदस्यांना स्नेहभेट देऊ लागले. सर्वच जण आश्चर्यकारक आनंदामध्ये होते. पूर्ण आयुष्य वृत्तपत्र वाचल्याशिवाय गेले नाही. वर्षातील काही हक्काच्या सुट्ट्या वर्तमानपत्राला झाल्या तरी आम्हाला करमायचे नाही.
साधे किराणामाल वृत्तपत्राच्या कागदांमध्ये बांधून आला तरी, तो कागद न वाचतासुद्धा हाताबाहेर नाही गेला, पण महामारीच्या काळामध्ये वृत्तपत्राशिवाय जीवन अनुभवले. आमच्या सौभाग्यवती अंथरुणावर खिळून राहिल्याने रोज नित्यनेमाने वर्तमानपत्रामधील ठरावीक सदर वाचून दाखवायचो, आमच्या पैकी प्रत्येकाचे थोड्याफार फरकाने सारखीच अवस्था. लोकशाहीचा चौथा स्तंभ, वृत्तपत्र पत्र नव्हे मित्र, वगैरे सगळे माहिती होते, पण कधी छपाई सुविधा बंद होईल असे वाटलेच नाही.
वर्क फ्रॉम होममुळे तरुण मंडळी लॅपटॉप, मोबाइलवर, लहान मुले टी. व्ही., मोबाइलवर, कसे वाचणार वृत्तपत्र? वयपरत्वे डोळे कमजोर झाल्यामुळे रोज कोणाला सांगणार वाचून दाखवायचे? न बोलतासुद्धा वृत्तपत्र, मार्गदर्शक पालकत्वाच्या भूमिकेतून सोबत असायचे. घरपोच वर्तमानपत्र देणारे “हात’ सुद्धा कधी दिसले नाहीत,
पण लॉकडाऊनमध्ये सगळ्यांची अनुपस्थिती आणि त्यांचे अस्तित्व प्रकर्षाने जाणवले. तेव्हाच ठरवले जेव्हा आपण या साऱ्या अडथळ्यांतून बाहेर पडू तेव्हा आपल्या कार्यालयात येऊन, आपणा सर्वांना भेटून कृतज्ञता व्यक्त करायची आणि आम्हा सर्वांच्या आयुष्यात कायम “आशेची पणती’ तेवत ठेवणाऱ्या हातांची भेट घ्यायची. या अनपेक्षित सदिच्छा भेटीने दैनिक वृत्तपत्र कार्यालयामध्ये “दिवाळी’ पहावयास मिळाली.
प्रसंग 2
नोकरीसाठी इकडे, तिकडे जोडे झिजवणे चालूच होते. काय या महासाथीने सगळ्यांचे रोजगार गेले. आता पुढे कसे करायचे? सिस्टमला समजत नाही? अशा माझ्या महान विचारांनी मी स्वतःला समजावत होतो. आर्थिक घडी महामारीमध्येच विस्कटली का? लॉकडाऊन आताच झाले का? आपल्या कर्तृत्वाचे लॉकडाऊन कधीच झाले होते आणि शाळेमध्ये ते पालकांपेक्षा शिक्षकांना अधिक समजत होते.
आमची वाटचाल कोणत्या दिशेने सुरू झाली या गोष्टी शिक्षकांपासून लपून राहिल्या नाही. किती दिवस दुसऱ्यांना दोष देणार? स्वतःपासून दूर पळणार? रोज पश्चाताप, हळहळ, नैराश्य असह्य होई, असे वाटे डोळे बंद करून घ्यावे कायमचे, आयुष्यातील त्या सर्वांना एकदाच भेटावे असे वाटायचे. शिक्षकांइतके निरपेक्ष प्रेम कोणी करू शकत नाही प्रकर्षाने जाणवले आम्हाला. तेव्हा वाटायचे, त्यांनी त्यांच्या कामाशी मतलब ठेवावा, आमच्यात लक्ष घालू नये. पण आता काळ लोटला, त्यांची आम्हाला योग्य मार्गावर लावण्याची धडपड किती निःस्वार्थी होती. फार अपेक्षा नसतील आमच्याकडून, पण कमीत-कमी “चांगला’ माणूस, चांगली व्यक्ती म्हणून आम्हाला घडवण्याची धडपड नक्कीच प्रामाणिक, निरपेक्ष होती.
आम्ही मात्र दादागिरी करत, कधीही मनावर घेतले नाही शिक्षकांचे मार्गदर्शन. कडक लॉकडाऊनमध्ये अनुभवले, पाहिले, आरोग्य देवदूत, माणुसकीची छोटी-मोठी उदाहरणे समाजातील प्रत्येकाने दिलेले मौल्यवान योगदान, बेवारस मृतदेहांवर जीव धोक्यात घालून सर्व रिती-रिवाजांप्रमाणे अंत्यसंस्कार करणारे “हात’.
तेव्हा जाणवले हे सुद्धा कोणाचे तरी विद्यार्थी असतील. त्यांना घडवणाऱ्या सर्वांना किती अभिमान वाटला असेल. खूप संधी होत्या स्वतःला सावरण्याच्या, पण आता सगळीच वेळ निघून गेली. तरी सुद्धा शिक्षकांना भेटण्याची, त्यांच्यापुढे मत मोकळे करण्याची, माफी मागण्याची “संधी’ या सणानिमित्त सोडायची नाही, त्याच्या मनातील निश्चयाची जणू “पहाटच’ झाली.
प्रसंग 3
क्लिनिक मध्ये “ती’ अचानक आली, मनातून आनंद वाटला मला. तिच्यासोबत बोलले पण त्यापेक्षा जास्त ऐकले. कदाचित “ती’ ते सांगायला आली असावी. हॉस्पिटलमध्ये “ती’ ऍडमिट होती, तेव्हा तिच्यासोबत संवाद साधायला समुपदेशन करायला अनेक वेळा जावे लागले. तेव्हा “ती’ त्या मनस्थितीत नव्हती, तिच्यावर आलेल्या-आणल्या गेलेल्या परिस्थितीमुळे कदाचित ती आक्रमक झाली असावी.
आत्मघाताचा अयशस्वी प्रयत्न तिला अस्वस्थ करत होता. वारंवार ती अस्वस्थता बाहेर येत होती. तिला पाहताच सर्व गोष्टी नजरेसमोरून जात होत्या. आज आत्मविश्वासाने, समाधानाने ती बोलत होती. वारंवार तिच्यासोबत तेव्हा संवाद-सुसंवाद साधल्यामुळे अनेक सकारात्मक बदल झाल्याचे तिने सांगितले.
महामारीच्या काळात अनेक रोजगार बंद पडले. परिणामी कौटुंबिक, वैयक्तिक जीवनावर परिणाम झाला. तरी सुद्धा नव्याने सुरू झालेला ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय वापरून पाहावा असे वाटले. पुढील शिक्षणासाठी बऱ्याच प्रदीर्घ काळानंतर ऑनलाइन शिक्षणाचा “श्री गणेशा’ तिने केला. बाहेर सगळे बंद, फोनवर अभ्यास फक्त आवाजाच्या साधनेवर शिक्षक, विद्यार्थी एकमेकांसोबत जोडले गेले, अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनी आपापल्या गावाला निघून गेलेले; पण ते पण ऑनलाइनमधून जोडले गेले.
खरे तर “आकाशवाणी’ सारखी ही “विद्यावाणी’ ठरली. प्रत्यक्ष समोर कोणी नसताना, केवळ उत्तम संवाद कौशल्य, शिकवण्याची हातोटी यामुळे शिक्षकांनी आम्हा सर्व विद्यार्थ्यांचे अभ्यासासोबत मनोधैर्य टिकवून ठेवले. आवाजाची ताकद, संवादाचे-सुसंवादाचे महत्त्व तिला समजले. बऱ्याच काळानंतर शैक्षणिक वातावरणामध्ये नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने अभ्यास अनुभवणे, आनंददायी वाटले.
प्रत्यक्ष महाविद्यालयात जाणे-येणे त्यासाठी वेशभूषा, प्रवास आणि इतर बाह्य गोष्टींना किती अकारण महत्त्व दिले जाते हे जाणवले, पण ऑनलाइन शिक्षणातून मिळणारा आनंद तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होता. आपत्ती आली पण जगणे “शिकवून’ गेली, म्हणूनच आपल्याला भेटायची इच्छा झाली आणि निघताना ती काही माझ्या हातात देणार, पण मी असे घेणे योग्य वाटले नाही असे सांगितले. तू परत “तुला’ मिळाली तुझ्या “लोकांना’ मिळाली त्यातच मला आनंद आहे, असे मी सांगितले. तिने शांत स्मित करता माझ्या हातात एक छोटी पणती ठेवली त्या पणतीचा स्निग्ध प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पाहात होते.
ऍड. मेघना कालेकर