मन चंचल आहे, हे माहीत आहेच; पण याच मनाच्या ऊर्जेचा उपयोग आपण करून घेतला तर? “मन मंदिरा’ या लेखमालेद्वारे आपल्या मनःशक्तीचा सुख-समाधान मिळविण्यासाठी कसा उपयोग करून घेऊ शकतो याचा विचार करणार आहोत.
आपण जन्मल्यापासून आपले मन आपल्या सोबत असते. आपण आपल्या मनात विचार करत असतो. वय जसे वाढत जाते तसतशी बुद्धी वाढत जाते, माहिती व ज्ञानही मिळत जाते. याद्वारेच आपले मन व विचार अधिकाधिक प्रगल्भ होत जातात. आपल्याकडे असलेल्या मनाची क्षमता ही अफाट आहे. आपल्याला याच क्षमतेचा उपयोग करून घेता आला पाहिजे. आपणा सर्वांची इच्छा असते की एक सुखी-समाधानी आयुष्य जगावे. आपण भौतिक सुखालाच खरे सुख मानतो.
मानसिक सुख-समाधान हे दुर्लक्षितच राहते. पैसे देऊन सुख विकत घेता येत नाही. आपण सुखी आयुष्य जगण्यासाठी मानसिक सुख-समाधानाला प्राधान्य दिले तर बरेच प्रश्न निर्माणच होणार नाहीत. बरेच प्रश्न आपणच आपल्या चुकीच्या वागण्या-बोलण्याने निर्माण करत असतो.
कधी आपल्या डोळ्यांसमोर कोणी एखादी व्यक्ती चुकीची वागताना दिसते, ती व्यक्ती अशी चूक का करत आहे हे आपल्याला समजतच नाही. आपण त्या व्यक्तीशी या प्रश्नाबाबत संवादही साधून पाहायला हरकत नाही. आपल्याला जे चुकीचे वाटते ते कदाचित बरोबरही असू शकते.
आपल्याकडे जी माहिती आहे त्यापेक्षा अधिक माहिती त्या व्यक्तीकडे असू शकते किंवा त्या व्यक्तीने अल्प माहिती व विचारांवर चुकीचाच निर्णय घेतलेला आहे का, हे सर्व आपल्याला कळेल. यामुळे आपण त्यासारख्या परिस्थितीतून भविष्यात कधी जाऊ त्यावेळी योग्य तो निर्णय घेता येतो. आपण आपली मानसिक तयारीही योग्य प्रकारे करतो.
आपण जेव्हा प्रतिकूल परिस्थितीत असतो, बाहेर पडण्याचा काही उपायच सापडत नाही अशा वेळी कोणी आपल्या जवळील व्यक्ती आपल्याशी काही सकारात्मक बोलून, धीर देऊन आपले मनोबल वाढविण्याचा प्रयत्न करते. यामुळेही आपल्या मानसिकतेत फरक पडतो. कधी उलटही होते. कोणी आपल्याशी बोलताना नकारात्मक बोलते, पण आपण “प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडायचेच’ असे मनोमन ठरविलेले असल्याने त्या नकारात्मक बोलण्याचा आपण सकारात्मक परिणाम आपल्यावर घडवून आणतो आणि त्याच क्षणी ठरवितो की, काहीही झाले तरी प्रतिकूल परिस्थितीवर मात करावयाचीच आणि यशस्वीही होतो. एखाद्या नकारात्मक बोलण्याचा सकारात्मक परिणाम आपल्यावर घडवून आणणे ही पण आपल्या मनाची जमेची बाजू आहे, ही आपल्या मनाची ऊर्जा वापरली पाहिजे.
कधी आपल्या विरोधात सगळेच असतात. आपणही प्रतिकूल परिस्थितीत असतो. अशा वेळी आपण मनाने खचून जाता कामा नये. आपण आपल्या मनाला धीर दिला पाहिजे. बऱ्याचदा काळ हेही एक औषध असते. आपल्यालाही प्रतिकूल परिस्थितीची थोडी सवय होऊन जाते. विरोधकही कमजोर पडू लागतात. एक क्षण असाही येतो की, आपण प्रतिकूल परिस्थितीवर मात करू शकतो. तो क्षण आपण सोडायचा नाही. असा क्षण मिळेपर्यंत आपण मात्र तग धरून राहिले पाहिजे.
आपण आपल्या जीवनात अनेक चढ-उतार पाहतो. अनेक सकारात्मक-नकारात्मक घटना अनुभवतो. हे सर्व अनुभवत असताना आपले मन आपल्याबरोबर असते. कधी प्रतिकूल परिस्थितीवर मात करताना मनाची उभारी धरावी लागते, तर कधी मन घट्ट करावे लागते. वास्तविक मन हे अमूर्त आहे. लवचिक आहे. त्यामुळे मनाच्या बाबतीत गणितासारखे कोणतेही नियम, सूत्र लागू होत नाहीत. आपले मन हे एक अथांग सागराप्रमाणे आहे. आपल्या मनाच्या एवढ्या छटा आहेत, एवढे पैलू आहेत की आपण गणनाच करू शकत नाही.
वास्तविक पाहता मनाबाबत काही बोलणे म्हणजे हवेला मुठीत पकडण्यासारखे आहे.आपल्या मनातील ऊर्जेचा उपयोग करून आपले आयुष्य सुकर, समाधानी करता येते. आपल्या जीवनातील रोजच्या घटना प्रसंगांभोवतीच केंद्रित असलेल्या मनाच्या विविध छटा विचारात घ्याव्या. मानसशस्त्रीय दृष्ट्या, अध्यात्मिक दृष्ट्या विचार न करता केवळ व्यवहारिक पातळीवर विचार करायला हवा.
मी माझे आयुष्य जगताना जो विचार करत गेलो, इतरांकडून शिकत गेलो, मी ज्या चुका केल्या त्यामुळे जे विपरीत परिणाम झाले, त्यातूनही बरेच शिकलो या व अशा बऱ्याच घटकांचा परिणाम माझ्या मनावर झाला आणि आमूलाग्र बदल घडत गेला. बऱ्याच वेळा असे लक्षात आले की, एखादी गोष्ट मिळविण्यासाठी अगदी जीवाचा आटापिटा केला, ती साध्य झाल्यानंतर असे वाटले की ती गोष्ट मिळविण्यासाठी जेवढे शारीरिक, मानसिक परिश्रम घेतले त्याचे मूल्य पाहता त्या गोष्टीपासून मिळणारे लाभ हे कमीच आहेत. मग कशाला आपण एवढा आटापिटा केला.
अशाकाही प्रसंगातून लक्षात आले की खरे सुख-समाधान काही वेगळ्याच कशात तरी आहे. आपण तहानलेल्याला पाणी दिले तर जे समाधान आपल्याला मिळते ते पैसे देऊनही मिळत नाही. आपण सर्व दुनियेला फसवू शकतो; पण आपल्या मनाला फसवू शकत नाही. मन आपली साथ कधीच सोडत नाही. म्हणूनच याच “मन मंदिरा’च्या गाभाऱ्यात बसून आपण आपल्या मनोदेवतेशी जर संवाद साधला तर बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि आपले आयुष्य सुखी-समाधानी व सुकर होण्यास मदत होईल.
आपण आपल्या मनोदेवतेशी संवाद साधायचा आहे. अशा विषयांचे, विचारांचे पुष्प अर्पण करत आपल्या मनोदेवतेची आराधना करूया. या दुनियेत जो कोणी माणूस जे काही करतो त्याची सुरुवात आधी मनापासूनच झालेली असते. आपण आपल्या परिवर्तनाची सुरुवात मनापासून करूयात असे मानापासून वाटते.
– अनिकेत भालेराव