नवी दिल्ली – “इंडिया (india) आघाडीचे लोक भ्रमिष्ट झाले आहेत. त्यांना आपण काय बोलत आहोत, याचे भान राहिलेले दिसत नाही. या नेत्यांनासनातनचा नायनाट करून देशाला पुन्हा गुलामगिरीत ढकलायचे आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केले. मध्य प्रदेशातील बीना रिफायनरी येथे पेट्रोकेमिकल्स कॉम्प्लेक्स आणि 10 औद्योगिक प्रकल्पांची पायाभरणी मोदी यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले, इंडिया आघाडीला अद्याप त्यांचा नेता ठरवता आलेला नाही. सामूहिक नेतृत्वाबाबत त्यांच्यात एकवाक्यता नसल्याने मोठा संभ्रम आहे. पण ही अहंकारी युती कशी चालेल, याचे धोरण आणि रणनीती त्यांनी आपल्या मुंबईच्या बैठकीत बनवली आहे. त्यांनी स्वतःचा एक छुपा अजेंडाही ठरवला आहे.
विरोधी आघाडीवर हल्लाबोल करताना पीएम मोदी म्हणाले, ही अहंकारी आघाडी सनातनची मूल्ये आणि परंपरा संपवण्याचा निश्चय करुन आली आहेत. ज्या सनातनवर खुद्द महात्मा गांधीजींनी आयुष्यभर विश्वास ठेवला, त्याच सनातनने गांधीजींना अस्पृश्यतेविरोधात आंदोलन करण्यास प्रेरित केले. पण आज या अहंकारी युतीच्या लोकांना ती चिरंतन परंपरा संपवायची आहे.
मोदी पुढे म्हणाले की, मध्य प्रदेशात 50,000 कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू केले जात आहेत; त्यामुळे राज्याच्या विकासाला चालना मिळेल. कोणत्याही देशाच्या किंवा कोणत्याही राज्याच्या विकासासाठी राज्यकारभार पूर्ण पारदर्शकतेने चालवणे आणि भ्रष्टाचाराला आळा घालणे आवश्यक आहे.
आजच्या पिढीला कदाचित हे आठवत नसेल, पण एक काळ असा होता जेव्हा मध्य प्रदेश हे देशातील सर्वात वाईट राज्य म्हणून ओळखले जात होते. स्वातंत्र्यानंतर दीर्घकाळ मध्य प्रदेशवर राज्य करणाऱ्यांनी भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीशिवाय राज्याला काहीही दिले नाही. तो काळ असा होता जेव्हा येथे गुन्हेगारांची सत्ता होती आणि लोकांचा कायदा आणि सुव्यवस्थेवर विश्वास नव्हता.
तुम्ही आम्हाला जेव्हा-जेव्हा सेवेची संधी दिली तेव्हा आम्ही पूर्ण प्रामाणिकपणे मध्य प्रदेशचे नशीब बदलण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. आम्ही मध्य प्रदेशला भयमुक्त करून येथे कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित केली. भारताने गुलामगिरीची मानसिकता मागे टाकून आता स्वतंत्र होण्याच्या स्वाभिमानाने पुढे वाटचाल सुरू केली आहे. कोणताही प्रदेश असा निर्णय घेतो तेव्हा त्याचे परिवर्तन सुरू होते. असं देखील यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले.