लाखणगाव-ज्या शेतकऱ्यांनी 31 मार्चपर्यंत सोसायटीचे कर्ज व व्याज भरले नाही, त्यांना 1 एप्रिलपासून 12 टक्के दराने कर्ज आणि त्यावर व्याज भरावे लागणार आहे. परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक कुचंबणा होत असून केंद्र व राज्य सरकारने सुरू केलेले कर्जावरील व्याज माफीची रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी आंबेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी केली आहे.
मार्चअखेर आर्थिक वर्ष संपत आल्याने शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज भरण्यासाठी शेतकरी जिल्हा बॅंकेत गर्दी करीत आहेत.केंद्र व राज्य सरकारने सहा टक्के व्याज देण्याचे जाहीर केले होते; परंतु सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये भरलेल्या पीक कर्जाचे व्याज अजूनही जमा झाले नाही आणि मार्च महिन्याचेही सहा टक्के व्याज सध्या बॅंकेत भरावे लागत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. शेतकऱ्यांना सोसायटीच्या माध्यमातून जिल्हा बॅंकेच्या वतीने वर्षातून एकदाच कर्जपुरवठा केला जायचा; प
रंतु सध्या रब्बी व खरीप अशा दोन हंगामांसाठी स्वतंत्र कर्ज पुरवठा केला जातो. त्यानंतर त्याची पहिली परतफेड मार्च महिन्यात करारवी लागते आणि दुसरी सप्टेंबरमध्ये करावी लागते. त्यानंतर मार्च महिन्यात भरलेले पैसे एप्रिलमध्ये पुन्हा पीक कर्ज म्हणून घेता येतात. सप्टेंबरमध्ये भरलेले पैसे ऑक्टोबरमध्ये पुन्हा पीक कर्ज म्हणून घेता येते. कर्ज भरताना तीन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर केंद्र सरकारकडून तीन टक्के व राज्य सरकारकडून तीन टक्के असे सहा टक्के व्याज माफ
केले जाते. पुणे जिल्हा सहकारी बॅंकेने तीन ते पाच लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर 11 टक्के सूट दिल्यामुळे एकंदरीत पाच लाख रुपयांपर्यंतचे कर्ज बिनव्याजी मिळते; परंतु पूर्वी केंद्र व राज्य सरकार 6 टक्के व्याजाची रक्कम जिल्हा बॅंकेच्या खात्यावर जमा करायचे, त्यामुळे शेतकऱ्यांना व्याज भरावे लागत नव्हते. शेतकरी मुद्दल भरायचे; परंतु सप्टेंबर, ऑक्टोबरपासून केंद्र व राज्य सरकारने ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार असे सांगितल्यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज आणि व्याज भरले; परंतु ती व्याजाची रक्कम अजूनही जमा झाली नाही. त्यातच मार्चचा कर्ज भरणाही सुरू झाला असून 6 टक्के व्याज शेतकऱ्यांना भरावे लागत आहे, असे अनिल वाळुंज यांनी
सांगितले.