नवी दिल्ली – छोट्या रकमेच्या एसआयपी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्युच्युअल फडांनी सुरू केले आहेत. त्यामुळे ग्राहकाकडून अशा योजना स्वीकारण्यात येत आहेत. परिणामी 2023 मध्ये एसआयपीच्या माध्यमातून झालेले संकलन 1.66 लाख कोटी रुपयांवर गेले असल्याची माहिती समोर आली आहे.
परवाच बाजार नियंत्रक सेबीने एसआयपीची रक्कम 250 रुपयापर्यंत कमी करण्याच्या योजनेवर विचार चालू असल्याचे सांगितले आहे. जर अशा प्रकारची योजना सुरू झाली तर एसआयपीच्या माध्यमातून होणारी गुंतवणूक आणखी वाढू शकते असे वातावरण आहे.
2020 मध्ये एसआयपीच्या माध्यमातून 97 हजार कोटी रुपयाचे संकलन झाले होते. 2021 मध्ये ही रक्कम 1.14 लाख कोटी रुपयांवर गेली. तर 2022 मध्ये ही रक्कम 1.5 लाख कोटी रुपयावर होती. आता केवळ 11 महिन्यात 1.66 लाख कोटी रुपये जमा झाले आहेत. आणखी एक महिन्यात मोठ्या प्रमाणात रक्कम जमा होण्याची शक्यता आहे.
मोतीलाल वस्तू या कंपनीचे व्यापार अधिकारी निखिल चतुर्वेदी यांनी सांगितले की, एकूण परिस्थिती पाहता आगामी काळात एसआयपीच्या माध्यमातून होणारी गुंतवणूक आणखी वाढण्याची शक्यता आम्हाला वाटते. फंड कंपन्या चांगला परतावा देत आहे. त्याचबरोबर विकासदर वाढला आहे. आगामी काळातही विकास दर वाढत राहण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत नागरिक म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत राहण्याची शक्यता आहे.
एक तर म्युच्युअल फंड कंपन्यांनी चांगला परतावा दिला आहे. त्याचबरोबर या कंपन्या चांगल्या योजना जाहीर करीत आहेत. नागरिकाकडे बरेच उत्पन्न शिल्लक राहत आहे. या कारणामुळे एसआयपीच्या माध्यमातून होणारी गुंतवणूक वाढत आहे. म्युच्युअल फंड कंपन्यांनी आणि म्युच्युअल फंड कंपन्यांच्या संघटनेने एसआयपी संदर्भात चांगली वातावरण निर्मिती केल्यामुळे गेल्या काही वर्षापासून एसआयपी संदर्भातील माहिती लोकांना होत आहे.
याचा परिणाम या क्षेत्रात गुंतवणूक वाढण्यात होत आहे. सध्या सर्वसाधारणपणे एसआयपीच्या माध्यमातून किमान 500 रुपये प्रत्येक महिन्याला जमा केले जाऊ शकतात. यामुळे छोट्या गुंतवणूकदारांना योजना आकर्षक वाटत आहे. ही रक्कम कमी करून 250 रुपयापर्यंत करण्याचा मनोदय सेबीने जाहीर केला आहे. जर खरोखरच ही रक्कम 250 रुपये पर्यंत आली तर मध्यमवर्ग आणि गरीब लोक इतरत्र गुंतवणूक करण्यापेक्षा एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकतील.
स्थानीक गुंतवणूदारांची रक्कम शेअर बाजारात आल्यानंतर शेअर बाजार निर्देशांकांना स्थिरता मिळू शकेल. सध्या परदेशी गुंतवणूकदारांनी विक्री केल्यानंतर शेअर बाजार निर्देशांक कमी होतात. मात्र स्थानिक गुंतवणूक वाढल्यामुळे गेल्या काही दिवसापासून परदेशी गुंतवणूक परत जात असली तरी शेअर बाजारावर त्याचा फारसा नकारात्मक परिणाम झाला नसल्याचे दिसून येत आहे.