सातारा – करोनाची भीती आणि आर्थिक संकटाच्या चक्रात अडकलेल्या सर्वसामान्यांच्या जनजीवनाला गती देणाऱ्या विघ्नहर्त्या गणरायाचे सातारा शहरासह जिल्हयात साधेपणातही उत्साहात स्वागत झाले. सातारकरांनी सोशल डिस्टन्सिंग पाळत अत्यंत भक्तीभावाने “श्रीं’ची प्रतिष्ठापना केली.
जिल्ह्यात करोनाच्या सावटातही गणेशोत्सवाचा उत्साह दिसून आला. यंदा ढोल ताशांच्या गजरात ना स्वागत मिरवणूक, ना जिवंत देखावे, ना विद्युत रोषणाई तरीही सार्वजनिक मंडळांनी आटोपशीर जागेत “गणपती बाप्पा मोरया’ म्हणत गणरायाचे स्वागत केले. हार, फुले, दुर्वा, फळे, पत्री आणि मोदकाच्या खरेदीसाठी राजवाडा परिसर व मोती चौकात सातारकरांची गर्दी झाली होती.
करोनाचे संकट असल्याने बाप्पांचे आगमन साधेपणाने झाले. मात्र, गणेशभक्तांचा उत्साह व आनंद यामध्ये तसूभरही कमतरता जाणवली नाही. सकाळी पावणेपाच ते दुपारी दोन असा मुहूर्त शुभ असल्याचे सांगण्यात आले होते. दुपारी तीन वाजेपर्यंत सार्वजनिक गणेश मंडळाची श्रींच्या स्वागताची लगबग सुरू होती. साताऱ्यातील सम्राट मंडळाने यंदा सामाजिक भान ठेवून गणेशोत्सवच रद्द केला.
प्रसिद्ध प्रकाश मंडळानेसुध्दा यंदा मांडवाचा बेत रद्द करून श्रीकांत शेटे यांच्या इमारतीच्या तळमजल्यात श्रींची स्थापना केली. गणरायाच्या स्वागताकरिता खरेदीची गर्दी साताऱ्यात जाणवली.फळ बाजार व मिठाईच्या दुकानात मोठी उलाढाल झाली. उकडीचे घरगुती मोदक पंचवीस रुपये नग व तयार मोदक 220 वीस रुपये अडीचशे ग्रॅम या दराने उपलब्ध होते.
शहरातील मानाच्या गणेशोत्सव मंडळांनी अतिशय साधेपणाने ना ढोल ना ताशा अशा स्वरूपात स्वागत केले. नगराध्यक्ष माधवी कदम यांनी घरात शाडूच्या मातीची मूर्ती बसवून सकाळी विधिवत पूजन केले. पोलिसांनी आवाहन केल्यानुसार शहरात भाविकांनी सोशल डिस्टन्स ठेवून गर्दी केल्याचे दिसत होते. जिल्ह्यातील साडेतीन हजार गणेश मंडळांनी रात्री उशिरापर्यंत बाप्पांची प्रतिष्ठापना केली.