सहकारी संस्थांना गावकऱ्यांचे आवाहन
खळद-येथे कऱ्हा नदीला आलेल्या महापुरामुळे शेतजमिनींचे मोठे नुकसान झाले असतानाच गावच्या सार्वजनिक मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यातून गावची परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी विविध सामाजिक संस्थांनी मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.
येथे महापुरामुळे पाणी पुरवठा विहीर, पाईपलाईन, संरक्षण भिंत, स्मशानभूमी परिसर, स्मशानभूमी शेड, पेव्हींग ब्लॉक, नवीन रस्ता, नवीन बांधकाम, दशक्रिया विधी घाट, खंडोबाचीवाडी रस्ता, कावडीचा रस्ता, पुल, जिल्हा परिषद शाळा संरक्षक भिंत असे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या सर्व सुविधा गावामध्ये होण्यासाठी अनेक दशके ग्रामस्थांना वाट पहावी लागली होती. एका क्षणार्धात होत्याचे नव्हते होत एवढे मोठे नुकसान झाले आहे. पुन्हा शासन स्तरावरून याला किती व कधी निधी मिळेल हे मात्र आता निश्चितपणे सांगता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये ज्या मूलभूत गोष्टींचे मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. किमान त्यासाठी तरी शासनाने तातडीने निधी देणे गरजेचे आहे. याचबरोबर गावच्या नवनिर्माणासाठी विविध सामाजिक संस्थांनीही पुढाकार घेत गावाला अर्थिक मदत करावी, असे आवाहनही ग्रामस्थांच्यावतीने करण्यात येत आहे.
महापुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र यातून पुन्हा उभे राहणेही गरजेचे आहे. गावाला पिलानवाडी जलाशयातून पाणीपुरवठा होतो, मात्र या पाण्याची साठवणूक करणारी सध्याची पिण्याची पाण्याची विहीर पूर्णपणे दगड, मातीने सपाट झाली असून गावात उन्हाळ्यापूर्वी नवीन विहीर होणे गरजेचे आहे. सध्या एका शेतकऱ्याच्या खासगी विहिरीतून गावाला पाणीपुरवठा होत आहे.