पिंपरी – रावेत येथील मेट्रो इको पार्कमधील झाडे देखभालीविना सुकल्याची धक्कादायक बाब महापालिकेच्या पंचनाम्यात समोर आली आहे. या पंचनाम्यात पार्कमधील तब्बल १४० झाडे पाणी न मिळाल्याने मृत जाहीर करण्यात आली आहेत. त्यामुळे, येथील झाडांची काळजी घेण्याच्या हरित लवादाच्या आदेशाची योग्य ती अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी केला आहे.
मेट्रोमध्ये बाधित होणा-या झाडांच्या पुनर्वसनासाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने मेट्रोला २०१७ मध्ये ५ एकरांचा भूखंड दिला. मेट्रोने या ठिकाणी जवळपास एक हजार वृक्षांची लागवड केली. तसेच नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक व सुशोभीकरण करून हा भूखंड ‘पीएमआरडीए’ला हस्तांतरीत केला होता. दरम्यानच्या काळात ‘पीएमआरडीए’ने या पार्कचा ताबा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिला. तेथून ही जागा निवडणूक आयोगाकडे आली. आयोगाने या जागेला सुरक्षिततेच्या कारणास्तव टाळे ठोकल्याने पार्कमधील झाडांची देखभाल करणे पर्यावरणप्रेमींना दुरापास्त झाले. झाडांना पाणी देण्यासाठी त्यांना प्रवेश नाकारण्यात येत आहे. त्यामुळे याबाबत परिसरातील नागरिक व पर्यावरणप्रेमींनी तक्रार केल्यानंतर नोव्हेंबरमध्ये हरीत लवादाने या झाडांची काळजी घेण्याचे आदेश दिले होते. मात्र, हे आदेश देऊनही देखभाल तसेच पाणी मिळाले नसल्याने तेथील १४० झाडे मृत झाल्याचा अहवाल महापालिकेच्या उद्यान विभागाने पर्यावरण प्रेमींच्या मागणीनुसार त्यांना दिला आहे.
बाधित झालेल्या काही झाडांबरोबरच पर्यावरण प्रेमींनीही काही झाडे तेथे लावली होती. तसेच त्यांना नियमित पाणी घालून ती जगवली होती. अनेकजण तेथे वॉकिंगसाठी जात होते. मात्र, नंतर ती निवडणूक आयोगाकडे देण्यात आली. त्या वेळी चुकीचा पंचनामा करण्यात आला होता. जमिन पडीक असल्याचे म्हटले होते. त्यानंतर वाद होत तो हरित लवादाकडे गेला होता. त्यानंतर हरित लवादाने तेथील झाडांची योग्य काळजी घेण्याचा आदेश दिला होता.
कोणती झाडे मृत
चेरी, पळस, बेहडा, आपटा, आंबा, करंज, सिंदूर, कल्पवृक्ष, रुद्राक्ष, नागकेशर, तुती, कृष्णवड, पिंपळ, जांभुळ, शमी या वृक्षांसह अनेक दुर्मिळ जातीच्या झाडांचा समावेश आहे.
काय आहे पंचनाम्यात
पर्यावरणप्रेमींनी केलेल्या मागणीनुसार पंचनामा केला
१४० झाडे मृतावस्थेत असल्याचे समोर आले आहे.
दोन ते तीन महिने झाडांना पाणी न मिळाल्याने अनेक झाडे मृतावस्थेत
झाडांभोवती आळे केलेले नाही.
पार्कमध्ये उंच गवत पाढले आहे
अनेक दुर्मीळ जातींची झाडे मृत
आमच्यासाठी पर्यावरण आणि वृक्ष हेच सर्व काही आहे. हरित लवादाच्या आदेशानंतरही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मेट्रो इको पार्कमधील झाडांची काळजी घेतली नाही. त्यामुळे, झाडे सुकली आहेत. जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे.
– प्रशांत राऊळ, पर्यावरण प्रेमी
आम्ही तेथे काही झाडे लावली. पाणी घालून मोठी केली. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून पार्क बंद करण्यात आले असून तेथील झाडांना पाणीही घालू दिले जात नाही. आम्ही विनंती करूनही पाणी घालू दिले जात नाही. महापालिकेच्या पंचनाम्यानुसार ही झाडे जळाली आहेत. सरकारी यंत्रणाच ही झाडे वाचविण्यास तयार नाही.
– विकास बडोलीया, पर्यावरण प्रेमी