मुंबई – केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिला आहे. या निर्णयाविरोधात ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे. निवडणूक आयोगाने आमच्यावर अन्याय केला असून न्यायासाठी आम्ही न्यायालयात धाव घेणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते.
यावरून आता शिंदे गटही सर्वोच्च न्यायालयात धाव घेत कॅव्हेट सादर केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने केवळ एकतर्फी बाजू न ऐकता दोन्ही बाजू ऐकून घ्याव्यात याकरता, शिंदे गटाने कॅव्हेट दाखल केले आहे.
निवडणूक आयोगाने शुक्रवारी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरेंच्या गटाकडून काढून घेतले. लोकप्रतिनिधींची संख्या कमी असल्याचा ठपका ठेवत, कॉंग्रेसच्या जुन्या निर्णयाचा दाखला देत केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला.
यावरून ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ठाकरे गटावर अन्याय होत असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून उद्या, सोमवारी सर्वोच्च न्यायलयात निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल करण्यात येणार आहे. ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायलयात याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने एकच बाजू ऐकून न घेता दोन्ही बाजू ऐकून घ्याव्यात याकरता शिंदे गटाने कॅव्हेट सादर केले आहे. या कॅव्हेटमार्फत आमचीही बाजू ऐकून घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, 16 आमदार अपात्र, विधानसभा उपाध्यक्षांवरील अविश्वास प्रस्तावावरून सर्वोच्च न्यायलयात सुनावणी सुरू आहे. हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे जावे अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. मात्र, ही मागणी तुर्तास राखून ठेवली आहे. त्यामुळे यापुढे 21 फेब्रुवारीपासून होणारी नियमित सुनावणी 5 न्यायाधीशांच्या घटनापीठापुढेच सुनावणी होणार आहे. या सुनावणीवेळी हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सोपवावे की नाही हे मेरिटनुसार ठरवण्यात येणार आहे.