पुणे – एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी फारकत घेत एक गटच स्थापन केला आहे. तब्बल 40 आमदार आणि 12 खासदार आपल्या गटात ओढून त्यांनी एकप्रकारे शिवसेनेला खिंडार पाडल्याचा एक अध्याय संपत नाही तोच आता जिल्ह्याजिल्ह्यांतील शिवसैनिकांचा त्यांना पाठिंबा वाढत असल्याने शिंदे यांचे शिवसेनेतील वलय अधोरेखित होत आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातही शिवसेनेवरही जबर आघात झाला आहे. एकएक शिवसैनिक पदाचा राजीनामा देत शिंदे गटात जात असल्याने आता जिल्ह्यात शिवसेनेची कसोटी लागणार आहे.
मावळचे खासदार श्रीरंग बारणे, शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, शरद सोनवणे यांच्यासह पुणे शहरातील अनेक शिवसैनिकांनी शिंदे गटाची वाट धरल्याने जिल्ह्यात शिवसेनेची वाट बिकट झाली आहे. दरम्यान, शिंदे यांनी बंड केल्यानंतर आढळराव पाटील यांनी 26 जून रोजी उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ सचिन अहिर यांच्या हजेरीत शिवसेनेचा मेळावा घेतला. त्यानंतर 2 जुलै रोजी मुख्यमंत्री पदी विराजमान झालेल्या एकनाथ शिंदेंना सोशल मिडियाद्वारे आढळरावांनी शुभेच्छा दिल्या.
या शुभेच्छा दिल्या म्हणून आढळरावांची 3 जुलैला शिवसेनेतून हकालपट्टी केल्याचे वृत्त सेनेच्या मुखपत्रामध्ये प्रसिद्ध झाले आणि काही तासांत पक्षाने यूटर्न घेतला आणि आढळराव पक्षातच असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले. या कारवाईनंतर पक्षाने माझी किंमत दाखवून दिली, असे वक्तव्य करीत आढळरावांनी पत्रकार परिषदेत उघडपणे नाराजी व्यक्त केली. लवकरच पुढची दिशा ठरवेन असेही सूचित केले होते, त्यानुसार आढळराव यांनी मंगळवारी (दि. 19) लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे मेळावा घेत शिंदे गटात हजारो शिवसैनिकांसह सहभागी झाले आहे.
शिवसेनेने राष्ट्रवादीशी केलेली युती खटकल्याचे कारण त्यांनी दिले आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता होती. त्यावेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही जिल्हा नियोजन समिती, पीएमआरडीए तथा शासनाच्या एकाही निर्णायक अधिकार असलेल्या समितीवर आढळरावांना स्थान नव्हते तसेच खेड तालुका पंचायत समितीच्या तत्कालीन सभापतींना अटक होणे, शासकीय कुठलीही यंत्रणा आढळरावांना गांभिर्याने घेत नसल्याची चर्चा होती. याच पार्श्वभूमीवर आढळरावांनी अखेर कंटाळून शिंदे गटाशी घरोबा केला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
18 वर्षांनंतर पुन्हा बंड
शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीत असताना 2004 मध्ये खेड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी हिरवा कंदील दिला होता. मात्र, ऐनवेळी उमेदवारीस नकार दिल्याने आढळराव यांनी थेट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेण्यासाठी “मातोश्री’ गाठले अन् 2004, 2009, 2014 अशी सलग तीन टर्म शिवसेनेच्या तिकिटावर खासदारकी मिळवली. मात्र, आता त्यांना पुन्हा शिरूर लोकसभा सोडून पुण्यात निवडणूक लढवण्याची अट टाकण्यात आल्याने अखेर त्यांनी शिंदे गटाचा पर्याय स्वीकारला. त्यामुळे तब्बल 18 वर्षांनंतर त्यांना राजकीय पुन्हा बंड करायला भाग पाडल्याचे बोलले जात आहे.