शिक्रापूर – शिरूर लोकसभा मतदार संघातील खासदार हे छत्रपती संभाजी महाराजांच्या नावावर मते मागून निवडून आले. परंतु त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीकडे जाणाऱ्या रस्त्यासाठीही निधी आणला नाही. परंतु सध्या ते गायब झाले आहेत. त्यामुळे खासदारांना शोधा अन् रोख बक्षीस मिळवा, अशा आशयाचे फलक सध्या शिरूर तालुक्यात सोशल मीडियावर घिरट्या घालत आहे, त्यामुळे तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे.
शिरूर लोकसभा मतदार संघातील खासदार डॉ. अमोल कोल्हे हे अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या विषयामुळे चर्चेत आले आहेत. अनेकदा त्यांच्यावर वेगवेगळ्या स्वरूपाच्या टीका देखील केल्या जात आहेत. खासदार डॉ. कोल्हे यांनी निवडणूक प्रचारादरम्यान अनेक आश्वासने मतदारांना दिली होती.
तर बैलगाडा शर्यती बाबत एका वर्षात निर्णय घेऊन बैलगाडा शर्यत सुरू करून बैलगाड्यांसमोर घोडी पळविणार असल्याचा वादा त्यांनी केला होता. त्यानंतर डॉ. अमोल कोल्हे खासदारपदी विराजमान होताच बैलगाडा शर्यत सुरू होण्याची आशा बैलगाडा शौकीन व बैलगाडा मालकांना लागलेली होती, तर कित्येक वेळेस लोकसभेमध्ये डॉ. कोल्हे यांनी बैलगाडा शर्यतीबाबत आवाज उठविला आहे.
परंतु सध्या शिरूर तालुक्यातील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीकडे जाणाऱ्या कोरेगाव भीमा ते वढू बुद्रुक रस्त्याची दुरवस्था झाली आहे. याबाबत भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देत सदर रस्त्यासाठी निधी मंजूर करण्याची मागणी केली आहे. मात्र सध्या शिवसेना पुणे उपजिल्हाप्रमुख अनिल काशीद यांनी शिरूरचे खासदार हरवले आहेत, त्यामुळे खासदारांना शोधा अन् बक्षीस मिळवा अशी ऑफर नागरिकांना दिली आहे. मात्र त्यानंतर अनेकांनी प्रतिक्रिया देत प्रतिसाद दिला.
अनेकांनी अनिल काशीद यांच्या आरोपाचे खंडन केले आहे. मात्र हे आरोप प्रत्यारोप करून कोरेगाव भीमा ते वढू बुद्रुक या छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळाचा रस्ता होणार का? नागरिकांची कामे मार्गी लागणार का? खासदार डॉ. अमोल कोल्हे मतदार संघातील दौरे करणार का? असे विविध सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
“कोरेगाव भीमा ते वढू बुद्रुक रस्त्यासाठी साडे सहा कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यासाठी प्रशासकीय मान्यता देखील मिळाली आहे. हे विरोधकांना माहिती नाही. मी मतदार संघातील अनेक समस्या सोडविल्या आहेत. अनेक प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे काम सुरूच आहे. यासाठी मला शोधण्याची गरज नाही.”
– डॉ. अमोल कोल्हे, खासदार शिरूर