औरंगाबाद – मराठवाड्याची मुलुख मैदानी तोफ अशी ओळख असलेले शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. केशवराव धोंडगे यांचे रविवारी निधन झाले. औरंगाबादच्या खासगी रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 102 वर्षांचे होते. पाच वेळा आमदार तर एकदा खासदार अशी त्यांची राजकारणातील कारकिर्द आहे. विधान परिषदेतील त्यांची अनेक भाषणे गाजली आहेत.
कंधार तालुक्यातील गऊळ गावी धोंडगे यांचा जन्म झाला. तेथून त्यांनी आपली राजकीय वाटचाल सुरु केली. दुर्लक्षित समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी ते नेहमी आग्रही असायचे. आमदार असताना धोंडगे आपल्या भाषणांनी विधिमंडळ सभागृह दणाणून सोडत होते. विविध प्रश्नांवरुन ते सरकारची कोंडी करायचे. सभागृहात सर्वात आधी येणारे व सर्वात शेवटी जाणारे सदस्य म्हणून त्यांची ओळख होती.
धोंडगे यांनी अनेक आंदोलने केली. सत्यागृह केले. आणिबाणीच्या विरोधातही त्यांनी लढा दिला. या लढ्यात ते 14 महिने कारागृहात होते. त्यांच्या सत्यागृहाची नावेही विशिष्ट होती. पिंडदान, बोंबल्या, शेणचारऊ, खईस कुत्री ही त्यांच्या सत्यागृहाची नावे कायम स्मरणात राहणारी आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे काम त्यांनी सुरु केले. साम्यवाद, मार्क्सवाद अशा दोन्ही विचारांवर त्यांची निष्ठा होती.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी संसदीय कारकिर्दिचे 50 वर्षे पूर्ण केली, त्यावेळी त्यांचा नांदेड येथे सत्कार करण्यात आला होता. निर्भिड आणि स्पष्ट वक्ता म्हणून धोडगे यांची ख्याती होती. 1975 साली आणिबाणीला विरोध करत तुरुंगवास भोगलेल्या धोंडगे यांनी 1977 मध्ये नांदेड लोकसभा जिंकली होती. 1995 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या रोहिदास चव्हाण यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.