मुंबई – परदेशातील परिस्थिती खराब झाल्यामुळे इतर देशाप्रमाणे भारतीय शेअर बाजारात कमालीची अस्थिर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक काढून घेत आहेत. या पार्श्वभूमीवर सलग चौथ्या दिवशी शेअर बाजाराचे निर्देशांक कोसळले. चार दिवसात गुंतवणूदारांचे 9.30 लाख कोटींचे नुकसान झाले आहे. (Share Market: Investors lost 9.30 lakh crore in four days in the share market)
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 454 अंकांनी कमी होऊन 72,488 अंकावर बंद झाला. दरम्यान दिवसभरात हा निर्देशांक 1,107 अंकांनी कमी जास्त झाला. यावरून शेअर बाजारात किती अनिश्चितता होती हे दिसून येते. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 152 अंकांनी कोसळून 21,995 अंकावर बंद झाला. ही परिस्थिती नजीकच्या भविष्यात सुधारण्याची कसलीही शक्यता नाही. त्यामुळे गुंतवणूकदारानी त्यातल्या त्यात किरकोळ गुंतवणूकदारांनी सावध राहून व्यवहार करण्याचा सल्ला दिला जात आहे.
जिओजीत वित्तीय सेवा या संस्थेचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले की, अगोदरच अमेरिकेतील व्याजदर कपात लांबीवर पडल्यामुळे शेअर बाजारात अस्थिर वातावरण होते. परदेशी संस्थागत गुंतवणूकदार शेअर बाजारातून गुंतवणूक काढून घेत होते. त्यातच आता इराण इस्त्रारायलदरम्यान संघर्ष निर्माण झाल्यानंतर त्याचा इतर देशाबरोबर भारतीय शेअर बाजारावर परिणाम होत आहे.
यामुळे चलन बाजार आणि खनिज तेलाच्या बाजारावरही नकारात्मक परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी अतिशय सावध राहून काही काळ व्यवहार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
नेस्ले कंपनीचा शेअर आज तीन टक्क्यांनी कोसळला. त्याचबरोबर टायटन, अॅक्सिस बँक, एनटीपीसी, टाटा मोटर्स, आयटीसी, टेक महिंद्रा, बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स या कंपन्यांच्या शेअरच्या भावात मोठी घट झाली, मात्र एअरटेल, पावर ग्रिड, इन्फोसिस आणि लार्सन अँड टुब्रो या कंपन्याच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली.
जागतिक परिस्थितीकडे लक्ष
भारताची स्थूल अर्थव्यवस्था कमालीची बळकट आहे. मात्र जागतिक परिस्थिती बिघडत चालली आहे. त्यामुळे भारतीय शेअर बाजारांना परदेशी गुंतवणुकीचा आधार मिळत नसल्याचे स्पष्ट होत आहे. मंगळवारी परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी तब्बल 4,468 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. या अगोदर गेल्या पंधरा दिवसापासून हे गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून विक्री करीत आहेत. अशा अवस्थेत सध्या फक्त देशांतर्गत किरकोळ आणि संस्थागत गुंतवणूकदारांचा निर्देशांकांना थोडाफार आधार मिळत आहे. परदेशातील परिस्थिती जोपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत निर्देशांक आगामी काळात खात्रीने वाढण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे.