पिंपरी – केंद्रातील भाजप सरकारकडून ईडी, सीबीआय, आयकर विभाग यांचा गैरवापर केला जात आहे. सत्ता मिळाली नाही या आकसातून राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु छापे टाका, काहीही करा, सरकार हलणार नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.
शरद पवार दोन दिवस पिंपरी चिंचवड शहराच्या दौऱ्यावर आहेत. आज (दि. 16) त्यांनी आकुर्डी येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, केंद्र सरकारकडून प्रत्येकवेळी केंद्रीय तपासयंत्रणांचा गैरवापर केला जात आहे.
अजित पवार यांच्या तीन बहिणींच्या घरी आयकर विभागाने छापे टाकले. पाच दिवस हे अधिकारी त्यांच्या घरात होते. त्याठिकाणी पंधरा अधिकारी चौकशी करत होते. मात्र चौकशी संपली तरी हे पाहुणे जाण्यास तयार नाही.
त्यांचा दोष नाही त्यांना वरून आदेश येत होते. एक-दोन दिवस पाहुणे ठीक असतात, मात्र त्यापेक्षा जास्त दिवस राहिले तर त्यांची हक्कालपट्टी करावी लागते.
पवार म्हणाले, या छापेमारीमध्ये काय मिळाले हे तपासयंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी सांगावे मात्र भाजपचे नेते समोर येऊन सांगत आहेत. माजी खासदार व माजी मुख्यमंत्री यांच्या सांगण्यावरून या तपासयंत्रणा काम करतात हे दुर्देव आहे. सीबीआयला कोणत्याही राज्यात कारवाई करायची असेल तर राज्याची परवानगी घेणे आवश्यक आहे.
मात्र तसे काहीही केले जात नाही. यावरूनच हे सिद्ध होते की राजकीय आकसाने कारवाई केली जात आहे. छापे टाकून सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न केले तरी हे सरकार पाच वर्ष टिकेल, ते हलणार नाही असेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.