आज १२ डिसेंबर… राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री, माजी केंद्रीय संरक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्याचे ४ वेळा मुख्यमंत्रीपद भूषवणारे देशाचे ज्येष्ठ नेते माननीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब हे आज वयाची ८३ वर्षे पूर्ण करून ८४ व्या वर्षात यशस्वी पदार्पण करत आहेत. देशातील मागील सहा दशकांचा राजकारणाचा समाजकारणाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला तर तमिळनाडूचे दिवंगत मुख्यमंत्री करुणानिधी व पश्चिम बंगालचे दिवंगत मुख्यमंत्री ज्योती बसू यांचा अपवाद वगळता एखादाच नेता इतका दीर्घकाळ सामान्य जनतेशी नाळ जोडून ठेवू शकला आहे. त्यातही अग्रक्रमाने नाव घ्यावं लागेल ते आदरणीय पवार साहेबांचं.
पवार साहेबांवर जीवनात आयुष्यात असंख्य हल्ले झाले, राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न झाला, नियतीने कॅन्सर सारखा आजार दिला, कमरेचं हाड मोडल्यानंतर पुढचं आयुष्य काठीच्या आधाराने जगावं लागेल की काय ? अशी परिस्थिती आली. या सर्व आव्हानांना जो पुरून उरला, नियतीसमोरही जो झुकला नाही अशा वादळाचं नाव म्हणजे शरदचंद्र पवार. म्हणूनच माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत अभिमान असेल… की होय मी आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये कार्यरत होतो,आहे आणि शेवटपर्यंत असेन.
आदरणीय पवार साहेबांचा ६० वर्षांचा राजकीय प्रवास जर आपण पाहिला तर आपल्या लक्षात येईल की कोणत्याही प्रकारचा संघर्ष न करता काँग्रेसच्या संस्कृतीत रममाण होऊन सत्तेतील अनेक पदे त्यांना आयती मिळाली असती.परंतु सह्याद्रीचा हा सुपुत्र नेहमीच वादळांना अंगावर झेलत आला, संघर्षाला मिठी मारत आला. म्हणूनच आजही महाराष्ट्रातल्या, भारतातल्या कानाकोपऱ्यात किंबहुना आशिया खंडातही पवार साहेबांचं नाव देशाचा लोकनेता, महाराष्ट्राचा सुपुत्र आणि मराठी योद्धा म्हणून घेतलं जातं हे निर्विवाद सत्य आहे. माझ्यासारखा कार्यकर्ता जेव्हा आदरणीय पवार साहेबांबद्दल दोन शब्द लिहू पाहतो तेव्हा शब्दही अपुरे पडतात,त्याच कारण म्हणजे महाराष्ट्रातल्या व देशातल्या सामाजिक,राजकीय जडणघडणीत साहेबांचं असलेलं योगदान हे इतकं अफाट आहे कि ते शब्दात, लेखात, पुस्तकात बंदिस्त होऊच शकत नाही. वयाच्या ८४ व्या वर्षात पदार्पण करत असताना आपल्या जीवनात तब्ब्ल एक हजार महिने पाहिलेला नेता आज पुन्हा एकदा संघर्षासाठी तयार आहे आणि म्हणूनच ह्या लेखप्रपंचाचा माझा प्रामाणिक प्रयत्न.
आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या-देशाच्या राजकीय व सामाजिक पटलावर आपला अमीट ठसा उमटवला.मंडल आयोग स्वीकारणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरलं ते आदरणीय पवार साहेबांच्याच नेतृत्वात. पवार साहेबांनी ९० च्या दशकात ओबीसी, एनटी समाजाला आरक्षण देण्याचा घेतलेला निर्णय हा क्रांतिकारी होता. एकेकाळी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अपवादाने एखाद महिला नेतृत्व दिसायचं, हे चित्र बदलण्यासाठी पवार साहेबांनी स्वतःच्या पक्षातील मंत्री,आमदार व खासदारांचा विरोध पत्करून महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३३% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला.
या एका निर्णयाने महाराष्ट्रातील महिलांच्या जीवनात राजकीय नेतृत्वाचा सूर्योदय झाला. या एका निर्णयामुळे गेल्या ३० वर्षांत लाखो महिलांना ग्रामपंचायत सदस्य, सरपंच,पंचायत समिती सदस्य, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष, नगरसेवक,महापौर अशा पदांवर काम करण्याची संधी मिळाली. संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार असताना देशपातळीवर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थामधे महिलांना ५०% आरक्षण देण्याचा निर्णय पवार साहेबांच्याच पुढाकाराने झाला. मुख्य प्रवाहात सर्वांना सामावून घेणारे नेतृत्व म्हणून आदरणीय पवार साहेब नेहमीच इतरांपेक्षा वेगळे ठरले.
महिलांचे जीवन सुरक्षित करून पवार साहेबांनी आपल्या आईने दिलेले संस्कार कृतीतून सिद्ध केले आणि म्हणूनच पवार साहेब मुख्यमंत्री असताना सातबाऱ्यावर पति बरोबर पत्नीचे नाव ठेवन्याचा निर्णय, रेशनकार्डावर कुटुंबप्रमुख म्हणून महिलेचं नाव आलं आणि कुटुंब व्यवस्थेत महिलेला मानाचं स्थान मिळालं, असा ऐतिहासिक निर्णय घेणार महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरलं, ही बाब इतिहासात नेहमीच सुवर्णाक्षरांनी लिहिली जाईल.
राज्यातील पोलीस दलात महिलांच्या सहभागासाठी पवार साहेबांनी विशेष प्रयत्न केले. देशाचे संरक्षणमंत्री असताना पवार साहेबांनी तीनही संरक्षण दलांमध्ये महिलांचं प्रतिनिधित्व असलं पाहिजे, राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, रणरागिणी लक्ष्मीबाई यांचा वारसा सांगणाऱ्या आमच्या भगिनींना देशाच्या रक्षणाची संधी मिळाली पाहिजे असा आग्रह धरत महिलांसाठी संरक्षण दलांचे दरवाजे उघडले.
पवार साहेबांनी पुण्यासाठी काय केलं, पवार साहेबांनी महाराष्ट्रासाठी काय केलं, पवार साहेबांनी देशासाठी काय केलं? अशा प्रकारचा विनोदी प्रश्न अनेकदा केला जातो. अपुऱ्या माहितीमुळे दुर्दैवाने तरुण पिढी याला आहारी जाते हे दुर्दैव आहे. परंतु याला कुठेतरी आमच्यासारखे कार्यकर्तेही कारणीभूत आहेत. कारण पवार साहेबांच्या नेतृत्वात पुण्याने, महाराष्ट्राने केलेली प्रगती, त्यासाठी पवार साहेबांनी घेतलेले निर्णय आम्ही वेगवेगळ्या व्यासपीठांवर ठेवू शकलो नाही. आज पुणे शहर जगाच्या नकाशावर आयटी हब म्हणून अभिमानाने उभं आहे याच श्रेय सर्वस्वी आदरणीय पवार साहेबांना जातं. हिंजवडी इथे साखर कारखाना उभारण्याचे नियोजित असताना, या साखर कारखान्याचे भूमिपूजन करताना “इथे साखर कारखाना होणार नाही तर इथे आयटी पार्क होणार” असे पवार साहेबांनी जाहीर केले.
या परिसरात असंख्य सवलती दिल्या, सुविधा दिल्या, इथे लाखो तरुणांना रोजगार मिळाला, पुण्याचं आर्थिक मागासलेपण दूर झालं. मगरपट्टा,खराडी येथेही स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आयटी पार्क उभारले. हे आयटी पार्क स्थानिक भूमीपुत्रासहित देशातल्या विविध राज्यांतून आलेल्या युवकांसाठी रोजगार देणार मोठं केंद्र म्हणूनच उदयास आले. या आयटी क्षेत्राच्या जोरावर पुण्यातील बांधकाम क्षेत्र व इतर क्षेत्रात लाखो कोटींची उलाढाल होऊ शकली हे सांगण्यात आम्ही कमी पडलो.
पुणे शहराचा भविष्यातील व्याप ओळखत ३०-३५ वर्षांपूर्वी टेमघर धरण बांधून पवार साहेबांनी पुणे शहराची पुढील ५० वर्षांची तहान भागवली. पवार साहेबांच्या नंतर राज्यात बरेच मुख्यमंत्री झाले, पुण्यात अनेक पालकमंत्री झाले परंतु पुणे शहरासाठी पुन्हा नवीन धरण झालं नाही.. ती दूरदृष्टी कोणाला लाभली नाही. पवार साहेबांच्या प्रयत्नांतून रांजणगाव, चाकण,दौंड,बारामती अशा अनेक तालुक्यांच्या ठिकाणी एमआयडीसी उभ्या राहिल्याने लाखो भूमिपुत्रांना रोजगार मिळाला, जमिनींना भाव मिळाला, हजारो नवीन गृहप्रकल्प निर्माण झाले. पवार साहेबांनी आग्रहपूर्वक चाकण आणि रांजणगाव एमआयडीसी स्थापन करून तेथील ऑटोमोबाईल क्षेत्राला पूरक उद्योग सुरु केले, म्हणूनच तिथून पुढच्या काळात पिंपरी चिंचवड हे ऑटोमोबाईल हब होऊ शकलं.
सांगण्यासारखं खूप काही आहे… परंतु सर्व सांगण्याची ही वेळ नाही. पाच महिन्यांपूर्वी झालेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पवार साहेबांच्या सोबत राहण्याचा निर्णय माझ्यासह लाखो कार्यकर्त्यांनी घेतला. याच कारण म्हणजे मागील ६० वर्षांत जातीधर्माचा आधार न घेता महाराष्ट्र राज्यासहित देशात सलोखा राखावा अशा प्रकारचा प्रयत्न पवार साहेबांनी कायम केला. ज्यांनी स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून राज्याला आपलं कुटुंब मानलं, तो नेता संघर्ष करत असताना आपण त्यांच्या नेतृत्वाख़ाली लढावं असं आम्हाला वाटलं. दिल्लीसमोर महाराष्ट्र झुकत नाही, महाराष्ट्र हा दिल्लीच्या बादशाहांसमोर संघर्ष करतो हा संदेश छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या नंतर आदरणीय पवार साहेबांनी दिला, म्हणूनच आपण मावळा बनून साहेबांच्या सोबत राहिलं पाहिजे अशी आमची भावना आहे.
माझ्यासारखे असे लाखो कार्यकर्ते राज्यात सापडतील ज्यांना कोणतीही राजकीय किंवा आर्थिक पार्श्वभूमी नसताना अनेक उच्च पदांपर्यंत पोचता आलं ते केवळ पवार साहेबांमुळे. स्वर्गीय आर.आर.पाटील साहेबांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिली पत्रकार परिषद घेतली तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू होते… त्यावेळेच त्यांचं एक वाक्य आहे कि, आदरणीय पवार साहेबांनी १० जून १९९९ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची निर्मिती केली, राष्ट्रीय पक्ष निर्माण केला. साहेबांनी स्वतः मोठ्या पदांवर जाण्याचा मोह टाळून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मोठं केलं, हे वाक्य माझ्या सारख्या लाखो कार्यकर्त्यांसाठी लागु आहे, हे आम्ही कधीच विसरु शकत नाही.
आदरणीय साहेबांना यापुढेही उदंड आयुष्य लाभावं व त्यांचा हात कायम आमच्या पाठीशी असावा हीच सदिच्छा