मुंबई – उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी मानल्या जाणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी उभारलेल्या बंडामुळे पक्षात उभी-आडवी फूट पडली आहे. सेनेचे बहुतांश आमदार शिंदे यांच्या गोटात सामील झाल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे भवितव्य सध्यातरी अंधारात आहे. सेना नेत्यांनी या बंडानंतर दिलेल्या प्रतिक्रिया देखील ते निराश असल्याचेच दर्शवत होत्या. मात्र आज (शुक्रवारी) हे बंड मोडून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार मैदानात उतरले आहेत. पवार यांनी आज संजय राऊत यांच्यासह शिवसेना नेत्यांसोबत बैठक घेतली. यानंतर ते आता उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी रवाना झाले आहेत. ठाकरे यांच्या या बैठकीवेळी पवार यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित असतील.
दरम्यान, हे बंड मोडून काढण्यासाठी शरद पवार हे स्वतः मैदानात उतरल्याने शिवसेनेच्या नेत्यांमध्ये देखील नव चैतन्य आल्याचं दिसतंय. बुधवारी महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार असल्याचं वक्तव्य करणारे संजय राऊत पवार यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर ‘पॉझिटिव्ह’ झाल्याचे पहायला मिळाले. पवार यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधताना विधानसभेच्या पटलावर बहुमत सिद्ध करण्याचा प्रसंग आल्यानंतर कोण कोणासोबत आहे हे समजेलच असं वक्तव्य केलं होत. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांना इशारा देखील दिला होता.
अशातच आज संजय राऊत यांनी पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर, ‘सध्या सेनेचे आमदार बंडखोर गटासोबत असल्याचं दिसत असलं तरी पुढे चित्र वेगळं असेल. महाविकास आघाडी सरकार टिकेल. आम्हाला पराजय मान्य नाही. आम्ही जिंकणार. जर रस्त्यावरील लढाई लढली गेली तर ती देखील आम्हीच जिंकू.’ असा ठाम विश्वास दर्शवला.
दरम्यान, मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज जिल्हा प्रमुखांशी संवाद साधताना बंडखोर आमदारांविरोधात जोरदार भूमिका घेतली. तसेच आपण वर्षा निवासस्थान सोडलं आहे मात्र मुख्यमंत्रीपद नाही असे देखील त्यांनी सांगितले. अशातच आता उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्यात भेट होणार असल्याने दोन्ही नेते हे बंड मोडण्यासाठी पुढील रणनीती ठरवू शकतात.
तत्पूर्वी, महाविकास आघाडीची स्थापना होत असताना अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फोडून बंड पुकारले होते. त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे ‘डेप्युटी’ म्हणून शपथ देखील घेतली होती. मात्र शरद पवार यांनी आक्रमकपणे मैदानात उतरून अजित पवार यांचे बंड मोडीत काढले होते. शिवसेना देखील अशाच बंडाला तोंड देत असून यामध्ये शरद पवार यांचा अनुभव कामी येणार का हे पाहावे लागेल.