धनकवडी, दि. 12 (प्रतिनिधी) -आंबेगाव पठार प्रभाग क्र. 39 मधील स.नं.29 चैतननगर भागामध्ये गेली अनेक महिने भारती विद्यापीठ भागातील सांडपाणी महापालिकेने टाकलेल्या पावसाळी वाहिन्यांमध्ये सोडण्यात आले आहे. यातून परिसरात डेंग्यू, मलेरियाची साथ पसरण्याची शक्यता आहे. चैतन्यनगर धनकवडीकरांच्या जीवाशी भारती विद्यापीठ कॅम्प प्रशासन खेळत असल्याचे नागरिक म्हणणे आहे.
पालिका प्रशासनाने याबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. भारती विद्यापीठ प्रशासनाचा धनकवडी कॅम्पसमध्ये पुणे मनपाच्या मल:निस्सारण धोरणानुसार ड्रेनेजच्या पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणे बंधनकारक असताना, या प्रक्रियेवर होणारा खर्च वाचावा म्हणून एच.टी.पी.प्लॅंट कार्यान्वित करण्यात आलेला नाही. याबाबत कॅम्पसचे वरिष्ठ व्यवस्थापक मनपाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सूचनांकडेही दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाही या प्रकारकडे दुर्लक्ष करीत असल्याने सांडपाणी थेट पावसाळी वाहिन्यांत सोडण्यात आले आहे. सदर समस्येबाबत आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
भारती विद्यापीठ प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे धनकवडी, चैतन्यनगर परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महानगरपालिका प्रशासनातील आयुक्तांना व क्षेत्रीय कार्यालय येथील सहायक आयुक्तांना या समस्येबाबत निवेदन दिले आहे. समस्या सुटेल अशी अपेक्षा आहे.
– विशाल तांबे, माजी नगरसेवक
संबंधित दूषित पाणी, एचटीपी ट्रीटमेंट प्लांट, पावसाळी लाइन व त्यावरील प्रक्रिया याबाबत कालच माझ्याकडे तक्रार आली. यावर लगेचच निर्णय घेत त्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत, येत्या दोन दिवसांत समस्या सोडवली जाईल.- डॉ. संजय ललवाणी,
वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय संचालक, भारती धर्मदाय हॉस्पिटल