नवी दिल्ली – भारत आणि बांगलादेश यांच्यात आज मोदी आणि शेख हसिना यांच्या उपस्थितीत एकूण सात करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. भारताच्या भेटीवर आलेल्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय बाबींवर चर्चा केली त्यानंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या करारामध्ये बांगलादेशातून ईशान्येकडील राज्यांना पाईपद्वारे भुगर्भ वायू पुरवण्याच्या प्रकल्पाच्याही कराराचा समावेश आहे.
अन्य करार, युवक कल्याण, सांस्कृतिक देवाण घेवाण, शिक्षण आणि तटवर्तीय क्षेत्रातील बंदोबस्त या क्षेत्रातील परस्पर सहकार्यांचे आहेत. आमच्या आजच्या चर्चेने दोन्ही देशांमधील संबंधांना अधिक उर्जा मिळाली आहे असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
त्यांनी सांगितले की गेल्या वर्षभराच्या काळात दोन्ही देशांमध्ये एकूण बारा प्रकल्प मार्गी लागले असून त्यांचे काम सुरू झाले आहे. शेख हसिना म्हणाल्या गेल्या काही वर्षांपासून दोन्ही देशांमधील सहकार्यात वाढ होत असून आता आम्ही सागरी सुरक्षा, अणुउर्जा आणि व्यापार क्षेत्रात अधिक जवळीकीने काम करीत आहोत.