नवी दिल्ली – देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी संसद भवनामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मात्र यंदा या कार्यक्रमास केंद्र सरकारमधील एकाही वरिष्ठ मंत्र्याने उपस्थिती न लावल्याने काँग्रेसने याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत असं देखील काँग्रेसकडून सांगण्यात आलं.
दरवर्षी १४ नोव्हेंबरला देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीचा कार्यक्रम संसदभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये करण्यात येतो. सेंट्रल हॉलमधील नेहरूंच्या तैलचित्राला यानिमित्ताने पुष्प अर्पण करण्यात येतात.
दरम्यान, नेहरूंच्या जयंतीनिमित्त संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमाला केंद्र सरकारमधील प्रमुख नेत्यांच्या अनुपस्थितीबाबत नाराजी व्यक्त करताना काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी, “ज्या नेहरूंचे तैलचित्र संसदभवनाच्या सेंट्रल हॉलची शोभा वाढवतं त्या नेहरूंच्या जयंतीदिनी आयोजित करण्यात आलेल्या पारंपरिक कार्यक्रमामध्ये आज वेगळं दृश्य पाहायला मिळालं. या कार्यक्रमाला लोकसभेचे स्पीकर अनुपस्थित होते. राज्यसभेचे सभापती अनुपस्थित होते. एकही केंद्रीय मंत्री उपस्थित नव्हते. यापेक्षा अधिक निर्घृण काही असू शकतं का?” असं ट्विट केलं.
काँग्रेसखेरीज अन्य विरोधीपक्षाच्या नेत्यांनी देखील घडलेल्या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली. तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनी, “मला आता कशाचंही आश्चर्य वाटत नाही. हे सरकार एका दिवसामध्ये भारतीय संसद आणि महान संस्था नष्ट करण्याचं काम करत आहे.” असं ट्विट केलं.
तत्पूर्वी आज सकाळी सेंट्रल हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात केंद्रीय एमएसएमई राज्यमंत्री भानू प्रताप सिंग वर्मा सहभागी झाले होते. याशिवाय राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि इतर खासदार उपस्थित होते.
संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये नेहरूंच्या पोर्ट्रेटचे अनावरण भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. एस. राधाकृष्णन यांच्या हस्ते ५ मे १९६६ रोजी करण्यात आले.