नवी दिल्ली – कार अपघातात टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचे निधन झाल्यामुळे कारमधील सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न पुढे आले आहेत. या अपघाताच्या तपासात ही बाब पुढे आली आहे की, मागील सीटवर बसलेल्या सायरस मिस्त्री यांनी सीटबेल्ट लावला असता तर त्यांचा जीव वाचला असता. किंबहुना हा अपघात जीवघेणा ठरला नसता. या अपघातात मोटारीचा वेग आणि सीटबेल्टचा वापर याबाबत नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून येत आहे. आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे की, मागील सीटवर बसणाऱ्यांनाही सीटबेल्ट बंधनकारक तसेच बीप अलार्मची सुविधा बंधनकारक करण्याबाबत नियम करण्यात येणार आहे.
कार उत्पादक कंपन्यांनी पुढील सीटवर बसणाऱ्यांनी बेल्ट लावला नाही तर अलार्म वाजण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे पुढील सीटवर बसणाऱ्यांनी बेल्ट लावला नसेल तर गाडी पुढे जाईल तसा बीप अलार्म वाजू लागतो. काही मोटारींमध्ये सीटबेल्ट न लावल्यास अनाऊन्समेंटची सुविधा देखील आहे.
सीट बेल्टमुळे प्रवाशी वेगाने धडकण्यापासून तसेच पडण्यापासून वाचतो. त्याचवेळी चेहऱ्याच्यासमोरील एअरबॅग उघडल्यामुळे जखमा होण्याची शक्यता कमी होते. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, सीटबेल्ट लावला नसेल तर एअरबॅग उघडल्या जात नाहीत. कारण सीटबेल्ट नसताना एअरबॅग उघडल्या गेल्या तर ते अधिक घातक ठरते. सीटबेल्ट लावला नसेल तर प्रवासी एका झटक्यात कुठल्याही दिशेला वेगाने फेकला जाऊ शकतो. अशा स्थितीत एअरबॅग उघडल्या तर तो त्यामध्ये अडकण्याचीच शक्यता जास्त असते. त्यामुळेच सीटबेल्ट लावला असेल तरच एअरबॅगची सुरक्षा मिळू शकते हे लक्षात घेण्याची गरज आहे.
अतिवेगामुळे जास्त बळी
रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अहवालानुसार अपघातात मृत्युमुखी पडण्याच्या घटनांमागे सर्वाधिक कारण हे अतिवेग हे असते. अतिवेगाबरोबरच चुकीच्या दिशेने गाडी चालवणे, मद्यपान करून वाहन चालवणे, मोबाईलवर बोलत किंवा सिग्नल तोडून पुढे जाणे ही अपघातात मृतांची संख्या वाढण्याची कारणे आहेत.
· 69.3 टक्के अपघातांमध्ये प्रवाशांचा मृत्यू होण्यामागे अतिवेग हे कारण होते. 2020 मध्ये देशात रस्ते अपघातात मरण पावलेल्यांची संख्या 91,239 इतकी होती.
· अपघातातील 73.4 टक्के प्रवासी हे अतिवेगामुळे जखमी झाले
· चुकीच्या दिशेने गाडी चालवल्यामुळे झालेल्या अपघातांमध्ये 7,332 जणांचा मृत्यू झाला.
· 3,322 जणांचा मृत्यू मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या चालकामुळे झाला.
· 2,917 जणांचा मृत्यू वाहन चालवताना चालकाने मोबाईल बोलण्यामुळे झाला आहे.