दुपारची वेळ माझी खास वाचन करण्याची वेळ. समीक्षणासाठी आलेली, नवीन खरेदी केलेली, भेट मिळालेली अशी पुस्तके माझ्या अवतीभवती पसरलेली असतात. त्या गराड्यात हरवलेली असताना लेकीचे गुणगुणणे कानावर पडले. सहजच त्या गाण्याकडे लक्ष गेले तर सध्या तरुणाईच्या ओठांवर रेंगाळणारे “कमरिया’ हे ते गाणे कोणते गुणगुणतेय? कसेसेच झाले.मी रागावले “अगं! असलं कसलं गाण म्हणतेस…
जरा दुसरं छानसं गाणं म्हण.’ तर मला म्हणते कशी, “अगं मम्मा, सध्या “इन’ आहे ते गाणे.बालकवी, शांताबाई यांच्या कविता गाणी ऐकत, म्हणत मोठी झालेली मी त्या “कमरिया’ गाण्याने मनात थोडी अस्वस्थच झाले. म्हणून ते गाणेही मला काट्यासारखे बोचले. पावसाच्या पहिल्या सरीने आसमंत दरवळला की चातक होणारी मी नकळत माझी पिढी आणि आत्ताची पिढी यांची तुलना करू लागले. यात माझी लेक किंवा तिच्या पिढीचा दोष आहे असे नाही; पण आपणच कुठेतरी कमी पडतोय की काय असे वाटत राहतं.
जपानसारखा राखेतून फिनिक्सची भरारी घेणारा देश उच्चतम अशा आधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच आपली भाषा, आपली संस्कृती उराशी कवटाळून आहे आणि ती पुढच्या पिढीकडे जागरूकतेने सोपवत आहे.आपली सख्खी शेजारी असलेली चिनी जनता देखील दिमाखात सायकल चालवत देशाचे प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न करतेय. आपल्या जुन्या वैद्यकीय ज्ञानाची जोपासना करून ते वाढवण्याचा, रुजवण्याचा
प्रयत्न करतेय.
जे देशाच्या संस्कृतीचे तेच काहीसे वैचारिक आणि भाषिक संस्कृतीचे. रशिया, फ्रान्स, जर्मनी, आयर्लंड यांसारखे देश आपापल्या देशांमध्ये आपल्या मातृभाषेसाठी आग्रही आहेत. आपापली मूळ संस्कृती जपण्यासाठी आग्रही आहेत. अशावेळी आपण मात्र आपल्या संस्कृतीला जुनाटपणाचे लेबल लावत मोडीत काढायला निघालो आहोत.
कोणतीही संस्कृती ही जुनी आणि पूर्वापार चालत आलेली असते. या संस्कृतीचे आपण पाईक असतो.
ती संस्कृती आपल्या परीने जतन करताना आपण ती पुढच्या पिढीकडे सोपवण्याचाही प्रयत्न करतो, पण आपण हे सर्व करताना आपल्या आजी, आजोबा, आई, ाबा यांच्याकडून पिढी दर पिढी झिरपत आलेला सांस्कृतिक वारसा जसाच्या तसा पुढच्या पिढीकडे सोपवण्यात यशस्वी ठरतोय का? हेही गांभीर्याने पाहिले पाहिजे.
माझ्या पिढीला आधीच्या पिढीकडून जे काही विचारधन, संस्कार आणि मूल्य मिळाली आहेत, ती जशीच्या तशी माझ्या पिढीकडून पोचवली जात नाहियेत आणि यासाठी कारणीभूत आपणच आहोत. काय गरज आहे? उगाच वेळ आणि पैशाचा अपव्यय, मनुष्यबळ नाही, कोण करणार? या आणि अशा अनेक कारणांना पुढे करत आपण आपले सारेच बाजूला सारत आहोत.
मोठ्यांचा आदर, घरी आलेल्याचा पाहुणचार अशा खऱ्या गोष्टी आपल्याला वेळखाऊ आणि खर्चिक वाटतात. वेळ आहे कुठे? मनुष्यबळ आहे तरी कुठे? या सबीखाली शॉर्टकट संस्कृती स्वीकारत चालले आहोत. आपल्या समृद्ध अशा परंपरा पाश्चात्य लोक अंगीकारत असताना आपण मात्र त्यांच्या स्वैर संस्कृतीचे अंधानुकरण पिढी दर पिढी करत चाललो आहोत. आम्हीच निर्माण केलेले वृद्धाश्रम बाळसे धरत आहेत आणि घरातील बाळे भरकटत चालली आहेत.
शास्त्रीय नृत्य, आयुर्वेद, संगीत, चित्रकला, वनस्पतीशास्त्र, तत्त्वज्ञान, स्थापत्यशास्त्र याचा परदेशी शास्त्रज्ञ, कलाकार, शिल्पकार भारतात येऊन अभ्यास करतात. हा खजिना त्यांच्या देशात नेऊन विकसित करतात आणि तिथे आपल्या भारतीय ज्ञानाचा आदर झाला की मग मात्र आपण खडबडून जागे होतो आणि हे आमचेच ज्ञान आहे असा आपला ओरडा सुरू होतो.
खरे तर संस्कृती नेहमी जुनीच असते. कालमापनानुसार अवाजवी आणि जाचक ंधनांच्या फांद्यांची काटछाट तिच्या पोषकतेसाठी गरजेची असते. पण आपल्या या आधुनिकतेच्या किंवा शॉर्टकटच्या अंधानुकरणात आपण आपल्या सांस्कृतिक मूल्यांकडे डोळेझाक करत चाललोय. या सर्व फाफटपसाऱ्यात पाश्चात लोकांचे गुण आपण दुर्लक्षित करतो.
त्यांची स्वच्छता, वक्तशीरपणा, कामाचे कस, कष्टाची तयारी, राष्ट्रनिष्ठा इत्यादी गुण आपल्या लक्षातच येत नाहीत आणि जाणून घेण्याचीही तयारी नसते; मग अंगीकारणे तर खूप लांबची गोष्ट आहे. आपल्या जुन्या जाणत्या पिढीला सोबत घेत नव्या पिढीच्या हातात हात घालून चालणे हाच खरा विकासाचा आणि उन्नत्तीचा तसेच संस्कृती संवर्धनाचा मार्ग आहे.
असे असतानाच नेमके कशाचे अनुकरण करायचे याचा विचारच केला जात नाही. आपल्या संस्कृतीच्या अभ्यासाने त्यांची प्रगती होईलच; पण संस्कृतीचा समृद्ध वारसा जतन करण्याची आणि अंगीकारण्याची जोवर आपली स्वतःची मानसिकता होत नाही तोवर आजची पिढी “कमरिया’ वरच अडकून राहील.
मानसी चिटणीस