कविता कशी सुचते, याचं नेहमी आश्चर्य वाटतं. कवीला थेट क्षितिजा पलीकडचं काही दिसतं हे नक्की. कविता आपल्याला अगदी तान्हेपणी आईने गायलेल्या “देवा तुझे किती सुंदर आकाश’ इथपासून भेटते ती कॉलेज जीवनात “पाय सोडून जळात बसला असला औदुंबर’ इथपर्यंत. ती कविता आठवणीत राहावी म्हणून शालेय जीवनात त्याला चाली लावल्या जायच्या. या कविता तेव्हा सतत गुणगुणत राहिल्याने लक्षात राहायच्या.
ग. दि. माडगुळकर यांच्या एका कवितेची आठवण थक्क करणारी आहे. त्यांच्या कन्येचे दुसऱ्या दिवशी लग्न होतं आणि आदल्या दिवशी एक प्रसंग सांगून त्यांनी कविता लिहावी अशी विनंती केली. कागदावर शब्द उमटले “लळा जिव्हाळा शब्दच खोटे.’ त्यांच्या प्रतिभेला सलाम.
“जे न देखे रवि ते देखे कवि’ असं म्हणतात. खरोखरच कवीला शब्दांच्या पलीकडील काही दिसतं. प्रेमात पडलेली व्यक्ती कविता करते असं म्हणतात. कारण ती सगळ्या जगाच्या, जगण्याच्या प्रेमात पडलेली असते. तर प्रेमभंग झालेली व्यक्ती जगापासून लांब जाते आणि आपल्या कवितेच्या सहवासात असते.
कविता पूर्वी छंदात, वृत्तात बसवली जायची. नंतर मुक्त कविता आली, त्यानंतर एखाद्या विषयावर केवळ चार ओळी लिहिणे पुरेसं वाटलं आणि “चारोळ्या’ आल्या. त्या लोकप्रिय झाल्या. काही कवितांचा बाजच और की शाळा सोडून खूप वर्षे होऊनही त्या सहजपणे गुणगुणल्या जातात.
कविता केव्हा सुचत असेल, आजुबाजूला अनुकूल परिस्थिती असताना, निसर्गाच्या सानिध्यात असताना, समुद्राकाठी असताना, आहे उत्तर, नाही ना! मंगेश पाडगावकर यांना चक्क लोकलने प्रवास करताना “श्रावणात घननीळा बरसला’ सारखी अप्रतिम कविता सुचली. या अलौकिक प्रतिभेवर आसपासच्या वातावरणाचा यत्किंचितही परिणाम झाला नाही. तशा परिस्थितीत त्यांनी लडिवाळ श्रावण अनुभवला.
शांता शेळके यांना एक इंग्लिश कविता शिकवताना “तोच चंद्रमा नभात’ सारखे अप्रतिम शब्द सुचले.
“झाडांशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवाया’ लिहिणारे कवी ग्रेस म्हणत माझ्या कवितेचा अर्थ मला विचारू नका कारण कविता लिहिताना ते सगळं माझ्या डोक्यात असतं. या कवितेत किती ताकद असते ना! “बर्फाचे तट पेटून उठले’ हे शब्द मनात जोश निर्माण करतात. “बलसागर भारत होवो विश्वात शोभूनी राहो’ हे शब्द मनात देशाभिमान जागा करतात.
“नीज माझ्या नंदलाला’ ऐकलं की मनातली आई जागी होते. “आज माझ्या साजणाने गुपित माझे जाणले लाजले मी लाजले’ ऐकलं की अंगावर रोमांच उभे राहिल्याशिवाय राहत नाहीत. कविता कशी सुचते याविषयी काही कवींनी लिहिलयं. पण ते सामान्यांना उमगणं अवघड. एखादी मोठी घटना, गोष्ट नेमक्या आणि कमी शब्दात मांडणं हा कवीचा हातखंडा असतो. “ससा तो कसा कापुस जसा’ आठवतयं ना! इतका मोठा आशय किती थोडक्यात सांगितलाय.
कवितेत मांडलेलं दु:ख आतडं पिळवटून टाकतं. माधव ज्युलियन यांची प्रेमस्वरुप आई वात्सल्य सिंधू आई असो की कवी अनिल यांची “अजुनी रूसूनी आहे, खुलता कळी खुलेना’ ही कविता असो. काही कविता दुर्बोध या विशेषणातच येतात. कवीच्या मनात नक्की काय आहे, त्याला काय म्हणायचंय हे जाम उलगडतच नाही.
तर काही कविता अशाही असतात ज्या वाचणाऱ्याच्या मनात घर करून राहतात. भा. रा. तांबे यांची “जन पळभर म्हणतील हाय’ ऐकली की
मी मी करणाऱ्यांचे पाय जमिनीवर येतात. तर
“मावळत्या दिनकरा अर्घ्य तुज जोडूनी दोन्ही करा’
ऐकलं की उगवतीचे सारे भाट हे तत्त्व पटतं.
समाजातल्या व्यथा त्यात कामगारांच्या, भटक्या जमातींच्या, दारिद्य्राच्या, माणसाला माणूसपण नाकारणाऱ्या कविता लिहिल्या आहेत.
थोर व्यक्तींची थोरवी, मोठेपणा वर्णन करणाऱ्या कविता रचल्या गेल्या. व्यथा मांडणाऱ्या कवितेतील काळीज चिरून टाकणारी सुरेश भट यांची कोन्यात झोपली सतार, सरला रंग, पसरली पैंजणे सैल टाकूनी अंग, दुमडला गालिचा तक्के झुकले खाली, तबकात राहिले देठ लवंगा साली. हे शब्दच वर्णन करायला पुरेसे आहेत.
कविता, आपली रसिकता जागी ठेवणारी, सुख-दुःखाच्या प्रसंगी सोबत राहणारी, कधीतरी कवी आपलीच व्यथा, भावना बोलून दाखवत नाही ना! असं वाटावं इत की जवळची.
डॉ. नीलम ताटके