सातारा – जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय स्व. यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या कुलागुणांना वाव मिळून त्यांच्यात सांघिक भावना निर्माण होते, असे मत ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संतोष हराळे यांनी व्यक्त केले.
जिल्हास्तरीय स्व . यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा स्पर्धेचे उदघाटन येथील शाहू क्रीडा संकुलात उत्साही वातावरणात झाले. याप्रसंगी संतोष हराळे बोलत होते. जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे आदींची यावेळी उपस्थिती होती. जिल्हा परिषदेच्यावतीने या स्पर्धांच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना सर्वोत्कृष्ट क्रीडा कौशल्य प्रदर्शित करण्याचे व्यासपीठ मिळत असल्याचे मत श्री. हराळे यांनी व्यक्त केले. शबनम मुजावर यांनी स्पर्धेचा हेतू प्रास्ताविकातून स्पष्ट केला.
जिल्हास्तरीय स्पर्धांअगोदर केंद्र, बीट व तालुकास्तरावर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. तालुकास्तरावरील वैयक्तिक स्पर्धांमधील पहिल्या तीन क्रमांक प्राप्त खेळाडू व सांघिक स्पर्धांमधील प्रथम क्रमांक प्राप्त संघ जिल्हास्तरासाठी पात्र ठरले. सोमवारी मोठा गट मुले मुली यांच्या धावणे ६० मीटर, १०० मीटर, २०० मीटर, ४०० मीटर, ६०० मीटर, ८०० मीटर, लांब उडी, गोळाफेक, थाळीफेक, बुद्धिबळ, योगासन, रिले ४ x १००, कबड्डी, खोखो, रस्सीखेच या प्रकारच्या स्पर्धा झाल्या. उद्या मंगळवारी दि. ६ रोजी लहान गट मुले मुली धावणे ६० मीटर, १०० मीटर, २०० मीटर, ४०० मीटर, ६०० मीटर, लांब उडी, योगासन, बुद्धिबळ, रिले ४ x१००, लंगडी व रस्सीखेच या स्पर्धा होणार आहेत.
सोमवारी झालेल्या वैयक्तिक व सांधिक क्रीडा प्रकारात प्रथम , द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त खेळाडू व संघांना सन्मानचिन्ह , प्रमाणपत्र व बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे प्रमुख समन्वयक म्हणून उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, जिल्हा क्रीडा समन्वयक, तालुका समन्वयक स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यरत आहेत.
उद्घाटन समयी कृष्णानगर शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझीम पथक व लाठी काठी या प्रकारांचे उत्कृष्ट सादरीकरण करून सर्वांची मने जिंकली. जिल्हास्तरीय गीतमंच स्पर्धेतील प्रथम क्रमांक प्राप्त शाळा केळवली (ता. सातारा) या शाळेने राज्यगीत व स्फूर्तीगीत सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. राजाराम तोरणे व जयमाला चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. रवींद्र खंदारे यांनी आभार मानले.