ग्रामीणमधील 2088, शहरी भागातील 192 शाळांचा समावेश
सातारा – करोनामुळे गेल्या दीड वर्षापासून बंद असलेल्या शाळा उद्या, दि. 4 पासून सुरू होणार आहेत. ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी आणि शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. ग्रामीणमधील दोन हजार 88 व शहरी भागातील 192 शाळांमध्ये मुलांचा किलबिलाट सुरू होणार आहे. करोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे ओसरला नसल्याने खबरदारी घेण्याची सूचना माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर व प्राथमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांनी केली आहे.
शाळा सुरू होणार असल्याने जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासन आणि ग्रामशिक्षण समित्या सतर्क झाल्या आहेत.
सप्टेंबरमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणात दोन हजार 442 शाळांची घंटा वाजू शकते, यावर शिक्कामोर्तब झाले. जिल्हा परिषद व प्रशासनाने त्यासाठी गाइडलाइन निश्चित केली आहे. ग्रामीण भागात शाळांमधील विद्यार्थी संख्या दोन लाख सहा हजार 53 व शहरी भागात शाळांमधील विद्यार्थी संख्या 78 हजार 808 असल्याचे चोपडे यांनी सांगितले.
“एक दिवस शाळे’साठी उपक्रम
करोनाचा धोका अद्याप संपला नसल्याने शाळांमध्ये कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, याची खातरजमा करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने एक दिवस शाळेसाठी’ हा उपक्रम सोमवारी राबवण्यात येणार आहे. या उपक्रमात पदाधिकारी व अधिकारी शाळांना भेटी देणार आहेत. याबाबतची सूचना अध्यक्ष उदय कबुले यांनी प्रशासनास दिली आहे. सर्व शाळांनाही आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी सांगितले.