पुणे – राज्यातील करोनाची स्थिती पाहता, विद्यार्थी हिताच्या दृष्टीने यापूर्वीच महाविद्यालये सुरू करणे आवश्यक होते. प्रत्यक्ष अध्यापन आणि प्रात्यक्षिकांसाठी प्रत्यक्ष महाविद्यालये सुरू नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
शिवाय त्याचा परिणाम शैक्षणिक गुणवत्तेवर होत आहे. एकीकडे उद्यापासून शाळा सुरू होत आहे, तर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण, हा विरोधाभास शैक्षणिकदृष्ट्या पूरक नसल्याचे मत शिक्षणतज्ज्ञांतून होत आहे.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्च 2020 पासून शाळा व महाविद्यालये बंद आहेत. त्याच आता सोमवारपासून आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू होणार आहेत. यापूर्वी ग्रामीण भागातील शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, महाविद्यालये सुरू करण्याबाबत राज्य सरकार कधी निर्णय घेणार, या प्रतीक्षेत विद्यार्थी आहेत.
विशेषत: महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे बहुतांश लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे शाळेच्या तुलनेत महाविद्यालयांतील विद्यार्थी अधिक सुरक्षित आहेत. असे असतानाही राज्य सरकार महाविद्यालये सुरू करण्यास वेळकाढूपणा का करीत आहे, असा प्रश्न उपस्थित आहे.
राज्यातील महाविद्यालये दिवाळीनंतर सुरू होणार असल्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे. मात्र, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अध्यापन, व्याख्याने, प्रात्यक्षिकांसाठी वर्ग सुरू होणे महत्त्वाचे आहे. त्याकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी शिक्षणतज्ज्ञांतून व्यक्त केली जात आहे.
करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जगातील अनेक देशांनी महाविद्यालये सुरू केली आहेत. मात्र, राज्यातील महाविद्यालये सुरू करण्यास विलंब होत असून, ही शैक्षणिकदृष्ट्या योग्य नाही. संस्थेतील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे बहुतांश लसीकरण झाले असून, विद्यार्थ्यांचे लसीकरण होत आहे. अशा स्थितीत सर्व नियम पाळून टप्प्याटप्प्याने महाविद्यालये सुरू होणे आवश्यक आहे. अन्यथा शैक्षणिक गुणवत्तेत आपण फार मागे पडू, अशी भीती आहे.
– ऍड. एस. के. जैन, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ
महाविद्यालयीन विद्यार्थी संवेदनशील असतात. त्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी तत्काळ महाविद्यालये वर्ग सुरू करणे आवश्यक आहे. ऑनलाइन शिक्षणातून फारसे आऊटपूट दिसून येत नाही. प्रत्यक्ष महाविद्यालयातील अध्यापन विद्यार्थ्यांवर प्रभाव पडू शकतो. महाविद्यालये सुरू केल्यास विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होऊ शकेल.
– प्रा. अजय दरेकर, शिक्षणतज्ज्ञ