शेतकरी हवालदिल; खटाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात लागण
म्हासुर्णे – बटाटा हे नगदी पीक आता हातातोंडाला आले आहे. खटाव तालुक्यात या पिकाची मोठ्या प्रमाणात लागण होत असते. त्यामुळे तालुक्यात बटाटा काढण्याला वेग आला असला तरी, ऐन मोसमातच बटाट्याचे दर ढासळले असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
खटाव तालुक्यातील पुसेसावळीसह म्हासुर्णे, चोराडे, होळीचागाव, रहाटणी, वांझोळी, लाडेगाव, गुरसाळे, निमसोड, वडी, भूषणगड, कळंबी, वडगाव, उंचीठाणे, पारगाव, गोरेगाव (वांगी), पळशी, गुरसाळे या गावांच्या शिवारांमध्ये बटाटा लागणी मोठया प्रमाणात आहेत. शेतकऱ्यांनी बटाटा पिकासाठी लाखो रुपये खर्चून पिके जोमात आणली आहेत. आता हे पिक काढणीला आले असताना दर घसल्यामुळे शेतकऱ्यांपुढच्या चिंता वाढणार आहेत. बटाटा हे पीक नगदी पीक आहे.
तीन महिन्यात पैसे करून देणारे असल्यामुळे शेतकरी वर्गाचा या पिकाच्या लागवडीकडे कल वाढला आहे. परंतु यावर्षी दरामध्ये झालेली घसरण शेतकऱ्यांना आर्थिक संकटात आणणारी ठरेल, अशी स्थिती आहे. आधीच या भागात पावसाने पाठ फिरवली असल्यामुळे पुढील हंगामातील पिके येतील का नाही, याची शाश्वती नाही. त्यामुळे आता हातातोंडाला आलेल्या बटाटा पिकाच्या दराने शेतकऱ्यांना थोडाफार हातभार लागेल, अशी अपेक्षा होती. परंतु तीही आता हवेत विरणार की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शेतकऱ्यांनी पै-पाहुणे, मित्र मंडळींकडून उसनवारी करून, तर काही शेतकऱ्यानी बॅंकांकडून कर्ज काढून बियाणे आणून बटाटा लागणी केल्या आहेत. त्या शेतकऱ्यांना आता बॅंकांचा बोजा कसा सहन करायचा असा प्रश्न पडला आहे.
“”बटाटा व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना बियाणे देताना वीस रुपये हमीभाव मिळेल अशी आशा दाखवल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पैसा नसतानाही इकडून तिकडून पैसे उपलब्ध करून बियाणे खरेदी केले. बटाटा लागणी केल्या आणि आता काढणीच्या वेळी त्याच बटाटा व्यापाऱ्याकडून बटाटा मालाची प्रत बघून 12 ते 15 रुपये दराने खरेदी होत असल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे.”
विजय पिसाळ, शेतकरी (म्हासुर्णे)
“”बटाटा लागणीसाठी एकरी खर्च: बटाटा बियाणे आठ क्विंटल (30 हजार रुपये), रासायनिक खते, औषध फवारणी व ड्रिप खते (25 हजार रुपये), शेतीची बटाटा पूर्व मशागत (पाच हजार रुपये), बटाटा लागण व काढणीसाठीचा खर्च (20 हजार रुपये), असा एकूण खर्च 80 हजार रुपयांच्या आसपास येत असतो. परंतु आता बटाट्याचे दर कमी असल्यामुळे घातलेले भांडवल निघते की नाही याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.”
सुनील पिसाळ, शेतकरी (चोराडे)