सातारा – भुईंजच्या किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाकडून गतवर्षीच्या गळीत हंगामाची सुमारे 80 कोटी रुपयांची शेतकऱ्यांची ऊसाची बिले रखडवली आहेत. कामगाराचा 18 महिन्यांचा पगार दिला नाही.
कारखाना व्यवस्थापनाने दि. 29 ऑगस्टपूर्वी ही देणी द्यावीत अन्यथा कॉंग्रेसच्यावतीने दि. 30 ऑगस्ट रोजी किसन वीर यांच्या जयंतीदिनी त्यांच्या कवठे येथील पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करणार आहे. तरीही प्रश्न न सुटल्यास न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचा इशारा युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांनी दिला.
येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कॉंग्रेसचे वाई तालुकाध्यक्ष रवींद्र भिलारे, उपाध्यक्ष कल्याण पिसाळ उपस्थित होते. शिंदे म्हणाले, “ऊसाची एफआरपी 14 दिवसांत देणे बंधनकारक असताना किसन वीर सहकारी साखर कारखाना व्यवस्थापनाकडून वारंवार अटी व शर्तींचे उल्लंघन करण्यात आले आहे. सध्याच्या घडीला 80 कोटी रुपये शेतकऱ्यांची देणी देणे बाकी कामगारांचा 18 महिन्यांचा पगार अद्यापही बाकी आहे.
याबाबत व्यवस्थापन, सहकार मंत्रालय व साखर आयुक्तांना वारंवार पत्रव्यवहार करूनही दखल घेतली गेली नाही.’ चार दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याने कारखान्यासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला असता दुसऱ्या दिवशी त्याला बिल अदा करण्यात आले. असे असले तर वाई, सातारा, जावळी, खंडाळा, महाबळेश्वर व कोरेगाव या तालुक्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांनी आत्मदहन करायचे का, एखादा जीव गेल्यावरच व्यवस्थापन जागे होणार का, असे प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केले.
शिंदे म्हणाले, “सध्या या मतदारसंघात असलेले आमदार गप्प का आहेत? आमदारकी धोक्यात येईल म्हणून त्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे.’ उगाच ठराविक लोक गोळा करून सहकारमंत्र्यांना भेटून निवेदन द्यायचे, तेवढे करून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार आहेत का, असा टोला त्यांनी आ. मकरंद पाटील यांना लगावला. आम्ही लोकहितासाठी जनआंदोलन उभे करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रवींद्र भिलारे म्हणाले, “किसन वीर आबांनी स्थापन केलेली संस्था टिकली पाहिजे ही कॉंग्रेसची भूमिका आहे. कॉंग्रेस पक्ष नेहमीच शेतकऱ्यांच्या हित पाहत आहे. किसन वीर कारखाना डबघाईला आला असतानाही सहकार मंत्रालय व साखर आयुक्त डोळ्यावर पट्टी मारून बसले आहेत.’ या संस्थेचा वापर हा राजकारणाचे अड्डे उभे करण्यासाठी वापर केला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.