सातारा (प्रतिनिधी) – रविवारी दुपारी सातारा शहरासह कराड ग्रामीण तसेच जिल्ह्यातील विविध भागात वळिव पावसाने चांगलाच तडाखा दिला. जोरदार वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने अनेक ठिकाणी विजेचे खांब, झाडे, शेड तसेच घरांवरील पत्रे उडून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सातारा शहर परिसरात रविवारी दुपारी मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या वादळी वारे आणि पावसामुळे कॅम्प परिसरात वृक्ष कोसळून विद्युत तारा तुटल्या आहेत. परिणामी महाराष्ट्र जीवन प्राधिकरनाकडून होणारा पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे.
गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात उकाडा चांगलाच वाढला होता. सकाळपासून हवामान उष्ण होते, पाऊस येईल अशी शक्यता वाटत असतानाच दुपारी अचानक आकाशात ढग दाटून आले. काही वेळातच जोरदार वादळ आणि मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. अचानक पाऊस सुरु झाल्याने नागरिकांची धावपळ उडाली. वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसामुळे काही काळ वीजपुरवठा खंडित झाला होता. सातारा शहर परिसरासह जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी या पावसाने हजेरी लावली.
राज्यात पूर्व मोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने दिवसभर उन्हाचा चटका कायम राहून वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली होती. त्यानुसार दुपारी पाऊस झाला. कॅम्प परिसरात अचानक वादळी वारे व पावसाने वृक्ष उन्मळून पडून विद्युत खांब व विद्युत तारांचे नुकसान झाले आहे परिणामी वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडून पाणी उपसा बंद करण्यात आला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्यावतीने महावितरण विभागास याबाबत कल्पना दिली आहे. त्यानंतर दुरुस्तीचे कामही सुरू करण्यात आलेले आहे. हे काम अत्यंत अडचणीच्या ठिकाणी असून काम पूर्ण होण्यास काही तास लागणार आहेत. परिणामी दुपारच्या सत्रातील पाणीपुरवठा विस्कळीत होनार आहे. काही भागांत पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. उपलब्थ पाणी काटकसरीने वापरून प्राधिकरणास सहकार्य करावे,असे आवाहन करण्यात आले आहे.