नागपूर – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत विविध मुद्द्यांवरून सरकारवर निशाणा साधत असतात. दोन दिवसांपूर्वीच ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. त्यावरून पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. संजय राऊत यांनी या प्रकरणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे.
नागपुरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “संजय राऊतांना काही कामधंदे नाही. त्यांचा पक्ष रोज कमी होत आहे. आम्हाला आमच्या संघटनेचं काम आहे. आमच्या पक्षवाढीसाठी आम्हाला फिरावं लागतं. त्यांना पक्ष वाढविण्यासाठी कुठं फिरावं लागत नाही. आमच्याकडे संजय राऊतांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी वेळ सुद्धा नाही.”
पुढे ते म्हणाले, “संजय राऊत सरकार गेल्यामुळे ते अस्वस्थ आहेत. त्यांची संघटनाही कमजोर होत चालली आहे. सध्या त्यांच्याकडे वेळच वेळ आहे. दिवसभर ते लिहितात, बोलतात. आम्हाला वेळ नसल्यामुळे आम्ही त्यांना किती उत्तरं आणि कशासाठी द्यावीत, महाराष्ट्राचं सामाजिक-राजकीय वातावरण खराब करावं? हा प्रश्न आहे”, अशी टीका बावनकुळे यांनी संजय राऊत यांच्यावर केली.
संजय राऊत काय म्हणाले होते ?
संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अंडरवर्ल्डप्रमाणे राज्य चालवत असल्याचे म्हंटले होते. “हे सरकार नसून गुंडांना पाठीशी घालणं सुरु आहे. ज्याप्रमाणे मुंबईत अंडरवर्ल्ड एखादा भाग चालवतो, तसं हे राज्य अंडरवर्ल्डप्रमाणे चालवलं जात आहे”, असे संजय राऊत म्हणाले होते.