पिंपरी – शहरातील करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील पीमएपी बसमध्ये खास प्रवाशांकरिता हॅण्ड सॅनिटायजरचे कंटेनर लावण्यात आले आहेत. मात्र, अनेक बसमधील कंटेनर नादुरुस्त झाले आहेत. त्यामुळे इच्छा असूनही प्रवाशांना बस प्रवासादरम्यान हात निर्जंतूक करण्यात अडचण निर्माण होत आहे. तर यामुळे करोनाचा प्रादुर्भाव झाल्यास त्याला जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 23 मार्च 2020 पासून देश लॉकडाऊन करण्यात आला. त्यानंतर केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यां करिताच पीएमपी बस विविध मार्गांवर धावत होत्या. या कालावधीत मात्र, सप्टेंबर महिन्यांपासून शारीरिक अंतराचे नियम राखत बसमध्ये सर्वसामान्य प्रवाशांना प्रवासाची मुभा देण्यात आली. कारखाने, खासगी आस्थापना तसेच शाळा, महाविद्यालये सुरु झाल्याने बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. या प्रवासादरम्यान करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येक बसमध्ये पीएमपीच्या वतीने हॅण्ड सॅनिटाजरची अर्धा लिटर क्षमतेचे कंटेनर बसविण्यात आले आहे. प्रवाशांनी या सॅनिटायजरचा वापर करणे अपेक्षित आहे. काही जागरुक प्रवाशांकडून या सुविधेचा लाभ घेतला जात आहे. मात्र, बहुतांशी प्रवाशांकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
दरम्यान, पीएमपीच्या अनेक बसमधील सॅनिटायजर कंटेनर नादुरुस्त असल्याने जागरुक प्रवाशांनाही सॅनिटायजर उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे एकत्रपणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून करोना प्रसार होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्यात हातभार लागल्यास, याची जबाबदारी कोणाची ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सर्व प्रकारची तपासणी करुनच पीएमपी बस मार्गावर सोडल्या जातात. यामध्ये हॅन्ड सॅनिटायजरचीदेखील तपासणी देखील केली जाते. एखाद्या बसमधील सॅनिटायजर कंटेनर नादुरुस्त असल्याचे आढळल्यास, वाहकांना सूचना देऊन, त्या बसमधील कंटेनर त्वरित बदलला जाईल.
संतोष माने
मुख्य समन्वयक, पीएमपी